अलिबाग: शासनाचे कल्याणकारी निर्णय समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून भाजपचे संघटन अधिक मजबूत करा. कार्यकर्ता म्हणून जनतेच्या समस्या जाणून घ्या, सरकारवर दबाव आणून त्यांची कामे करून घ्या असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलिबाग येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान कार्यक्रमाच्या निमित्ताने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दोन दिवसांच्या अलिबाग दौऱ्यावर आले आहेत.
शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, मुद्रांक शुल्क व नोंदणी तसेच भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर कुरुळ येथील माळी समाज हॉलमध्ये आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपस्थितांशी संवाद साधत कार्यकर्त्यांची निवेदने स्वीकारली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार हे राज्यातील आजवरचे सर्वात मजबूत सरकार असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले की, या सरकारने जनतेच्या हिताचे तब्बल ६५ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
यामध्ये शासकीय जमिनींवरील घरे अधिकृत करण्याचा निर्णय, सुमारे ३३ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि वीज बिल माफीचा समावेश आहे. तसेच पुढील पाच वर्षांत रायगड जिल्ह्यातील ३ हजार ९५० पाणंद रस्ते पक्के केले जाणार असून त्यांचे डिजिटली मॅपिंगही केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यकर्त्यांनी थेट लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या शोधाव्यात आणि नवे कायदे बनवून जनतेचे जीवन सुलभ करता येईल अशा समस्या सरकारच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीस भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कोकण विभागातील भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश धारप, जिल्हा सरचिटणीस ॲड. महेश मोहिते, कृषी सभापती वैकुंठ पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील आणि माजी अध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारने केलेल्या कामांचा प्रचार-प्रसार प्रामाणिकपणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन माजी खासदार धैर्यशील पाटील यांनी आपल्या भाषणात केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. महेश मोहिते यांनी केले.