नेरळ : पुण्याहून मुंबईला निघालेली मध्य रेल्वेची सुमारे 5300 टन वजनाच्या मालगाडीचा अत्यंत गंभीर थरारक प्रकार समोर आला आहे. ही मालगाडी लोणावळा ते पळसदरी या दरम्यान असलेल्या घाट मार्गावरील तीव्र उतार पार करीत असताना, पळसदरी आणि कर्जत रेल्वे स्थानका दरम्यान या मालगाडीवरील मोटरमनचे नियंत्रण सुटल्याने अचानक वेगाने धावू लागली, मात्र काही अंतर पूढे गेल्यावर नियंत्रण मिळवून मालगाडी थांबवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले.
नियंत्रण गमावलेल्या आणि परिणामी अत्ंयत वेगाने धावणाऱ्या या मालगाडीचा व्हिडिओ समोर आला असून त्यात मालगाडी ही प्रचंड वेगाने धावताना दिसत आहे. गुरुवारी तीन रेल्वे इंजिन जोडण्यात आलेली एमजी मालवाहू रेल्वेगाडी घाट उतारावर अचानक वेगाने धावू लागली. ठाकूरवाडी परिसरात या मालगाडीला जोडण्यात आलेल्या बँकर लोकोच्या ब्रेक यंत्रणेत बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान प्रसंगावधान राखत बँकर लोको डब्ल्यू ए जी 12 रेल्वे इंजिनचे लोको पायलेट आणि ट्रेन मॅनेजर यांनी समन्वय साधत ही मालगाडी अखेर कर्जत-भिवपुरी रेल्वे स्थानक सेक्शनच्या दरम्यान सुरक्षित रित्या थांबविण्यात यश मिळवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी वा रेल्वेचे नुकसान झालेले नाही.मोठा मात्र अर्नथ टळला आहे. या मालगाडीवरील कार्यरत सर्व लोकोपायलट व गार्ड हे सुरक्षित असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.
प्राथमिक प्राप्त माहितीनुसार या मालगाडीमध्ये प्रशिक्षणार्थी लोको पायलटचाही समावेश असल्याचे व उतारावरील मालगाडीवर नियंत्रण ठेवताना समस्या आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र नेमके कारण काय, ब्रेक यंत्रणेत बिघडा कसा झाला आणि जबाबदारी निश्चित कोणाची या संदर्भातील नेमके कारण हे समोर आले नसल्याने, या संदर्भात मध्य रेल्वे प्रशासनाकडून सविस्तर तपास सुरू आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने घटनेची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता.