महाडः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रसद पुरवत असल्याचा आरोप केला होता, मात्र हे सर्व आरोप पूर्णपणे बिनबुडाचे, तथ्यहीन असल्याचे राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केले आहे.
गोगावले यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देताना सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायम सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासाच्या दिशेने काम करत आहेत. कोणत्याही समाजामध्ये तेढ निर्माण होईल किंवा एका समाजाला दुसऱ्या समाजाविरोधात उभे करण्याचे राजकारण त्यांनी कधीही केलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
सरकार सर्व घटकांच्या न्याय्य मागण्यांचा विचार करत असून कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजामध्ये शांतता आणि सलोखा कायम ठेवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राजकीय मतभेद असले तरी समाजात संभ्रम निर्माण करणारे आरोप करण्याऐवजी वस्तुस्थितीच्या आधारे भूमिका मांडली जावी, असे आवाहनही मंत्री गोगावले यांनी केले.
मराठा आरक्षण संवेदनशील विषय
मराठा आरक्षण हा राज्यातील संवेदनशील विषय असून त्याकडे राजकीय फायद्याच्या दृष्टीने न पाहता सामाजिक समन्वयाच्या भूमिकेतून पाहण्याची गरज असल्याचेही गोगावले यांनी नमूद केले. समाजामध्ये गैरसमज पसरविणारी विधाने करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काहींकडून केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.