Varadvinayak Ganpati
खोपोली : प्रशांत गोपाळे : वरदविनायकाचे गणपती मंदिर हे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात आहे. अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून हा ओळखला जातो. या गणपतीची अगदी जवळ जाऊन पूजा करता येत असल्याने गणेश भक्तांमध्ये मोठी श्रध्दा पाहायला मिळत असते. महड येथील वरदविनायक या रूपात हा गणपती सर्व इच्छा - आकांक्षा पूर्ण करणारे गणराज म्हणून ओळख आहे
पेशवे काळात वरदविनायक मंदिराचा जिर्णोद्धार झाला असला तरी हेमांडपंथी आहे. गणेश येथे वरदविनायक (समृद्धी व यश देणारा ) या रूपात राहत असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात 1690 साली सापडली. 1725 साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महड गावही वसवले. या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. 8 फूट बाय 8 फूट असलेल्या या देवळाला 25 फूट उंचीचा कळस आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी अखंड नंदादिप तेवत राहिलेला असतो, अशी आख्यायिका गायली जाते की, हा नंदादीप 1892 पासून पेटता आहे.
प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता. तो आपल्या राणीसह अरण्यात गेला. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. राजाने तपश्चर्या सुरु केली. विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला.'तुला लवकरच' पुत्रप्राप्ती होईल' असा त्याने राजाला वर दिला.काही दिवसांनी राजाला पुत्र झाला, त्याचे नाव रुक्मांगद. रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने सारा राज्य कारभार त्याच्यावर सोपविला व त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले. एकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात भटकत असता तो वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात गेला ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरुक्त झाली, पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. तिने रुक्मांगदाला शाप दिला. सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला नारदमुनी भेटले. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले. तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला. त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. त्याच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला. त्याचे नव गृत्समद. हाच तो ऋग्वेदातील प्रसिध्द मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा करता.
गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहित झाली होती. त्यामुळे त्याचा पदोपदी पाणउतारा होऊ लागला. मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृत्समदाला हीन लेखू लागले. तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला. मग तो पापक्षालनार्थ पुष्पक (भद्रक) वनात तप करू लागला. त्याने विनायकाची आराधना केली. त्यामुळे विनायक प्रसन्न झाला. विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, 'तू याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर. विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला. ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे महड क्षेत्र. या ठिकाणी गृत्समदाला वर मिळाला म्हणून येथील विनायकाला 'वरद विनायक' म्हणतात. गृत्समद हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो.
पुरातन काळात महडचे नांव मणिपूर वा मणिभद्र होते. श्री वरद विनायक महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी चौथा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. ती मूर्ती या मंदिरात ठेवलेली आहे. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे. व डाव्या सोंडेची आहे. इ. स.1725 मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे – मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे.
कसे पोहोचाल?
महड येथील वरदविनायक स्थान सहा किमी दूर खोपोली जवळ आणि पुण्याहून 80 किमी दूर हे मंदिर मुंबईच्या जवळ स्थित आहे. पालीपासून एक तासांच्या अंतरावर खोपोलीजवळील इमॅॅजिका मार्गे महामार्गावरून उत्तरेकडे सरळ आणि खोपोलीच्या आधी हे मंदिर महड गावात वसलेले आहे.
मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवरुन खालापूर येथे येवून महडाला जाता येते.
मुंबई-पुणे जुन्या महामाप्गावरुन महड फाटा येथून मंदिराकडे जावू शकता.
पनवेल-खालापूर एसटीने महडा फाटा येथे उतरुन मंदिरात जाता येते.