वेल्हे : पुढारी वृत्तसेवा: पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी सिंहगड, खडकवासला, पानशेत धरण परिसरात रविवारी (दि. 26) पर्यटकांची सकाळपासून अक्षरशः झुंबड उडाली होती. गर्दीने वाहतुकीची कोंडी झाली आहे. वाहनांची इतकी गर्दी होती, की शनिवार-रविवार या दोन दिवसांत तब्बल साडेतीन लाखांचा टोल वसूल झाला आहे. खडकवासला चौपाटीवरील पुणे-पानशेत रस्ता, सिंहगड घाटरस्त्यावरील प्रचंड वाहतूक कोंडीत तासन् तास पर्यटकांसह स्थानिक नागरिक अडकून पडले होते. नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागली. शनिवारी सिंहगडावर वाहनाने जाणार्या पर्यटकांकडून वन खात्याने दीड लाख रुपयांचा, तर रविवारी दोन लाख, असा दोन दिवसांत विक्रमी साडेतीन लाख रुपयांचा टोल वसूल केला.
रविवारी चारचाकी 679 व दुचाकी 2700 वाहने गडावर गेली. गडावरील वाहनतळ हाऊसफुल्ल झाल्याने सकाळी दहा वाजल्यापासू घाटरस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. अवसरवाडी व गोळेवाडी दोन्ही मार्गांवर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे दिवसभरात तब्बल आठ ते दहावेळा घाटरस्ता बंद करण्यात आला. गडावर जाण्यासाठी टोलनाक्यावर थांबलेल्या वाहनांच्या रांगा थेट डोणजेपर्यंत लागल्या. परिणामी, वारंवार वाहतूक कोंडी होत होती. सिंहगड वन विभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके, वनरक्षक बाळासाहेब जिवडे, नितीन गोळे, रमेश खामकर, तानाजी खाटपे, राहुल मुजुमले, चव्हाण, गोफणे आदी 34 सुरक्षारक्षक घाटरस्त्यापासून वाहनतळापर्यंत वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रात्रीपर्यंत धावपळ करीत होते.
पानशेत भागात अधूनमधून तुरळक पाऊस पडला. खडकवासला धरणतीरावरील चौपाटीच्या पुणे-पानशेत रस्त्यावरच खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या टपर्या, पर्यटकांची वाहने उभी असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला तब्बल चार किलोमीटर अंतरावर रांगा लागल्या होत्या. नांदेड फाट्यापासून खडकवासला, डीआयटी, डोणजे, सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. वारीत बंदोबस्तासाठी बहुतांश पोलिस गेल्याने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अपुर्या मनुष्यबळासह हवेली पोलिसांना धावपळ करावी लागली.
सिंहगडावर दिवसभरात तीस हजारांहून अधिक पर्यटक
सिंहगडावर दिवसभरात तीस हजारांहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. पानशेत, वरसगाव, खडकवासला धरण परिसरही पर्यटकांनी गजबजून गेला होता. शनिवारी गडाचा कडा कोसळून गिर्यारोहकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गडाच्या प्रवेशद्वार, तटबंदी, बुरुजावर वन खात्याने सुरक्षारक्षक तैनात केले होते. धोकादायक ठिकाणी उभे राहून फोटो काढून नयेत, असे आवाहन केले जात होते. मात्र, तरीही उत्साही युवक-युवती बुरुजावर चढून फोटो काढत होते. गड सकाळीच हाऊसफुल्ल झाल्याने दिवसभरात आठ ते दहा हजारांवर पर्यटक माघारी गेले. हजारो पर्यटक अतकरवाडी येथे वाहने उभी करून पायी गडावर गेले.
मनाई असतानाही गडावर मुक्काम
मनाई असतानाही सिंहगड किल्ल्यावर मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत तरुणाई जल्लोष करीत आहे. तर, अतिदुर्गम राजगड, तोरणागडावर शेकडो पर्यटक मुक्काम करीत आहेत. सिंहगड, राजगड सारख्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या संरक्षित स्थळांच्या पावित्र्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. शनिवारी ( दि.25) राजगड किल्ल्यावर पाचशेहून अधिक पर्यटक मुक्कामी थांबले होते. पुरातत्व खात्याने राजगड, तोरणासह सर्व गडावर रात्री मुक्कामी थांबण्यास मनाई केली आहे. एक पाहरेकरी व तीन सुरक्षारक्षक राजगडावर तैनात केले आहेत. असे असले तरी त्यांना मुक्कामी थांबणारे पर्यटक जुमानात नाहीत. दरम्यान, रविवारी (26) गडावर सहा ते सात हजारांवर पर्यटकांनी गर्दी केली होती. सिंहगडावर जाण्यास सायंकाळनंतर पर्यटकांना मनाई आहे. असे असताना अवसरवाडी, तसेच डोणजे गोळेवाडी मार्ग घाट रस्त्याने रात्री-अपरात्री गडावर जाऊन प्रेमीयुगुल अक्षरशः हैदोस घालत आहेत.
हेही वाचा