कोंढवा : टाळ, चिपळ्या, मृदंगाच्या सुमधुर आवाजात अभंग, गवळणीचा सूर, तर काही ठिकाणी कीर्तनाचा जयघोष रात्रंदिवस वानवडी कोंढवा परिसरात सुरू होता. यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत भक्तिमय वातावरण तयार झाले होते. वानवडी-कोंढवा व आसपासच्या परिसरात अनेक ठिकाणी माऊलींच्या व जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील अनेक दिंड्या परिसरात विसावल्या आहेत. अनेक ठिकाणी सामाजिक संस्था व राजकीय प्रतिनिधी वारकर्यांची सेवा करीत होते.
ठिकाणी पंगती दिसत होत्या. वारकर्यांना औषधे, डोळे तपासणी अगदी तुटलेली चप्पल शिवण्यापासून ते केस-दाढी मोफत केली जात होती. प्रत्येक जण वारकर्यांची वाट पाहत होते. त्यांची सेवा करण्यासाठी नागरिकांची धडपड दिसत होती. केदारी पेट्रोल पंपाशेजारील मोकळ्या जागेत जालना येथील ह. भ. प. पांडुरंग महाराज आनंदे यांची दिंडी विसावली आहे. माउलीच्या पालखीपुढे ही दिंडी गेल्या 20 वर्षांपासून पायीवारी करीत आहे. यामध्ये महिला-पुरुष असे तीनशे वारकरी सहभागी झाले आहेत. मैदानात आकर्षक अशा झोपड्या टाकून मध्यभागी ह. भ. प. लक्ष्मीताई वाडेकर यांचे कीर्तन सुरू होते. या दिंडीची सेवा माजी नगरसेवक शिवाजी केदारी, साहिल केदारी व त्यांचा परिवार करीत आहे.
हेही वाचा