पुणे

मुळशीतील गावांना मिळणार दिवसाआड पाणी; धरणाची पाणीपातळी खालावली

अमृता चौगुले

पौड, पुढारी वृत्तसेवा: मुळशी धरणाची पाणीपातळी खालवली असून, धरणावर अवलंबून असलेल्या मुळशी प्रादेशिकच्या पाणीपुरवठा योजनेतील गावांना दिवसाआड पाणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिवसाआड पाणी देण्याबाबत ग्रामपंचायतींना मुळशी प्रादेशिक नळ पाणीपुरवठाकडून पत्र देण्यात आले आहे.

मुळशी धरणावरून मुळशी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून यातून 21 गावांना पाणीपुरवठा केला जातो. या योजनेत पिरंगुट, कासारआंबोली, घोटावडे, पौड यासारखी मोठी गावे समाविष्ट करण्यात आलेली आहे. मात्र मुळशी धरणाचा कधी नव्हे एवढा पाणी साठा कमी झालेला असून प्रादेशिकच्या पाईपच्या खाली पाणी गेल्याने योजना अडचणीत आली आहे.

यावर मुळशी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. सध्या वीज बनविण्यासाठी लागणारे पाणी, कडक उन्हाळा, पाण्याची वाढत असलेली मागणी, शेतीसाठी उपसा यामुळे धरणाचे पाणी कमी होऊ लागले आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पुढील काही दिवसांत धरण परिसरात जोरदार पाऊस होऊन धरणाच्या पाणीपातळीत वाढ होण्याची गरज आहे.

पौडला दिवसाआड पाणी

मुळशी धरणाची पाणीपातळी खालावत चाललेली असून, पाण्याची अडचण निर्माण झालेली आहे. याचा पहिला फटका पौड गावाला बसलेला असून, गेल्या आठवडाभरापासून पौडला दिवसाआड पाणी दिले जात आहे.

पुढील काही दिवसांत धरण परिसरात मोठा पाऊस झाला नाही तर पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. मुळशी प्रादेशिक योजनेवर असलेल्या गावच्या ग्रामपंचायतींनी पाण्याचे योग्य नियोजन करावे. ग्रामस्थांनीही पाण्याची नासाडी न करता पाणी जपून वापरावे.

                           – सुनील पटेकरी, उपअभियंता, मुळशी प्रादेशिक योजना

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT