वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा : 'कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. जरी सरकार अडचणीत आले, तरी आपण आमदार असणारच आहे. उलट आपल्याला अडीच वर्षे सत्ता मिळाली, तो आपल्यासाठी बोनसच होता,' या शब्दांत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांनी राजकीय परिस्थितीबाबत विचारणा केली असता उत्तर दिले.
अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे बुधवारी (दि. 29) मंत्री भरणे यांच्या माध्यमातून पालखीतळावर सुमारे 3 कोटी 80 लाखांचा निधी खर्चून होणार्या काँक्रीट रस्ताकामांचे भूमिपूजन व पालखीतळाशेजारी असलेल्या क्रीडासंकुलात दीड कोटीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन करण्यात आले.
सध्याच्या राजकीय अस्थिरतेवर भरणे यांनी आजवर या विषयावर बोलणे टाळले होते. परंतु, कार्यक्रम प्रसंगी कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे विचारणा केली. त्या वेळी भरणे यांनी कार्यकर्त्यांना धीर देत सांगितले की, 2019 मध्ये जनतेने राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिला होता. परंतु, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुत्सद्दीपणामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि आपल्याला अनपेक्षितपणे मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळाली.
या कालावधीत आपण तालुक्यात शेकडो कोटींचा विकास निधी आणून तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला आहे. शिवाय, आपण नव्याने मंजूर करून आणलेल्या निधीतून आगामी काळात होणारी विकासकामे किमान अडीच वर्षे चालतील. त्यामुळे अजिबात चिंता करण्याचे कारण नाही. उद्या सरकार अडचणीत आले, तरी आपण विरोधी बाकावर बसूनही पुरेसा निधी आणू शकतो. उलट आता मिळालेली अडीच वर्षांची सत्ता आपल्यासाठी बोनस होती, असेहीते म्हणाले.