पुणे : पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात बँकांसाठी 2 हजार 843 कोटी 55 लाख रुपये पीक कर्जाच्या वाटपासाठी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. 15 जूनअखेर 1 हजार 716 कोटी 77 लाख रुपये इतके म्हणजे उद्दिष्टाच्या साठ टक्क्यांइतके पीक कर्जाचे वाटप पूर्ण झाले आहे. कर्ज वाटपात सरकारी व व्यापारी बँकांपेक्षा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) आघाडी घेतली आहे. पावसाअभावी जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी चिंतातूर आहे.
मात्र, खरिपाच्या तयारीसाठी एप्रिल महिन्यापासूनच शेतकर्यांनी बी-बियाणे, खतांसाठी पीककर्ज घेण्याचे प्रमाण चांगले राहिल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्या ताज्या अहवालावरून दिसून येत आहे. 15 जूनअखेर 1 लाख 98 हजार 463 शेतकर्यांना 1 हजार 716 कोटी 77 लाख रुपयांइतके (60.37 टक्के) पीककर्ज वाटप पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे तथा बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी दिली. पुणे जिल्हा बँकेने 1 हजार 465 कोटी 77 लाख, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 1.45 कोटी, सरकारी बँकांनी 178.52 कोटी आणि खासगी बँकांनी 71.03 कोटी रुपयांइतके पीककर्ज वाटप पूर्ण केले आहे.
चालू वर्षातील खरिपात जिल्हा बँकेने 15 जूनअखेर 1 हजार 465 कोटी रुपयांइतके सर्वाधिक पीककर्ज वाटप (81.36 टक्के) पूर्ण केले आहे. जे सरकारी व खासगी बँकांपेक्षा अधिक आहे. बँकेकडून उसासाठी 584 कोटी टोमॅटो पिकासाठी 551 कोटी 28 लाख रुपये आणि अन्य पिकांमध्ये खरीप पिकांसह कांदा, बटाटा, द्राक्षे, डाळिंब, भात आदी पिकांसाठीही कर्जवाटप केले आहे.
– प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, चेअरमन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
हेही वाचा