पुणे, पुढारी वृत्तसेवा: परतीच्या पावसाने दिलेली हुलकावणी, तीव्र उन्हाळा, पाण्याची वाढती मागणी, धरणांमधील पाण्याचे झालेले बाष्पीभवन आणि ग्रामीण भागासाठी जादा आवर्तन यामुळे यंदा खडकवासला धरणसाखळीत गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पाणीसाठा शिल्लक आहे.
चार धरणांमध्ये पाऊस सक्रिय होत असला, तरी सध्या 4.58 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे,' अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली. गेल्या वर्षी धरणसाखळीत 6.93 टीएमसी पाणीसाठा होता. सन 2020 आणि सन 2019 मध्ये ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत होता. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धरणे भरलेली होती.
त्यामुळे सन 2019 आणि 2020 मध्ये जलसंपदा विभागाला शहरी आणि ग्रामीण भागाला मुबलक प्रमाणात पाणी देण्यात आले. तसेच 2019 मध्ये 'निसर्ग' आणि 2020 मध्ये 'तौक्ते' चक्रीवादळामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार वादळी पाऊस झाला होता. त्यामुळेही जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पाऊस सक्रिय होताना धरणांमधील पाणीसाठा फारसा कमी झालेला नव्हता.
दरम्यान, सन 2016 मध्ये अर्धा जून महिना संपल्यानंतरही पावसाचे आगमन झाले नव्हते. तेव्हा धरणांमध्ये अवघा दोन टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याबाबत महापालिका प्रशासन आणि जलसंपदा विभागाकडून चाचपणी सुरू होती. मात्र, प्रत्यक्षात ती वेळ आली नाही.
सन 2017 मध्ये 14 जूनपर्यंत पाऊस सक्रिय झाला होता. त्या वेळी खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांत तीन टीएमसीच्या आसपास पाणीसाठा होता. सन 2018 मध्ये पाऊस सक्रिय होताना धरणांमध्ये सध्याप्रमाणेच पाणीसाठा कमी होता, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा