पुणे : पुढारी वृत्तसेवा: राज्यातीत सर्व शासकीय कार्यालयांतील लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता ही पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील सकारात्मक प्रस्ताव राज्यसेवा आयोगाने शासनास सादर केला आहे. आता ही पदे 'एमपीएससी'मार्फत भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंतापदांच्या भरतीची प्रतीक्षा करणार्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पारदर्शक पद्धतीने भरती होण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील अराजपत्रित गट 'ब' आणि 'क' संवर्गातील पदांची भरती 'एमपीएससी'मार्फत करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली होती. यापूर्वी काही विभागांच्या परीक्षा विविध कारणांनी रद्द कराव्या लागल्या.
त्यामुळे उमेदवारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. परंतु, आता लिपिक, टंकलेखक व कनिष्ठ अभियंता ही पदे 'एमपीएससी' मार्फतच भरण्यात येणार असल्याने पारदर्शी पद्धतीने भरती होईल. 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात नियमितपणे घेतलेल्या बैठका तसेच वेळोवेळी अधिकार्यांना केलेल्या सूचना, यामुळे हा विषय मार्गी लागण्यास गती मिळाली,' असे रोहित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा