Pune Politics: खासदार वर्षा गायकवाड राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देत होत्या. परंतु काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्या मूर्तीकडे न पाहता दुसरीकडे नजर फिरवली. ती मूर्ती घेतली नाही, मूर्ती हातात न घेता त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आमच्या छत्रपतींचा अपमान आमच्याच महाराष्ट्रात करणार्या लोकांना तुम्ही निवडून देणार का? महाराष्ट्रात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घालणार्या हाताला निवडून देणार का? असे प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मतदारांना साद घातली.
कसबा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उमेदवार गणेश भोकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ठाकरे बोलत होते. फडके हौद चौकात झालेल्या सभेवेळी मनसेचे नेते व प्रवक्ते अविनाश अभ्यंकर व अनिल शिदोरे, उमेदवार गणेश भोकरे, मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे व अॅड. गणेश सातपुते, मनसे नेते राजेंद्र ऊर्फ बाबू वागस्कर, महिला सेनेच्या शहराध्यक्षा वनिता वागस्कर आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, कसबा गणपतीचे दर्शन घेऊन मनसेची स्थापना केली होती, त्यामुळे या मतदारसंघाशी माझे घट्ट नाते आहे. कसब्याला ऐतिहासिक वारसा आहे. माँ जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी याच भूमीत सोन्याचा नांगर फिरवून हे शहर वसवले होते. आज अस्ताव्यस्त वाढलेले हे शहर समस्यांनी ग्रस्त आहे.
मात्र, आपण आपला इतिहास, स्वाभिमान विसरलो आहोत. केवळ जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देऊन चालणार नाही, तर इतिहास समजून घेऊन तो जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शहर कसेही वाढत चालले आहे. त्याला कोणतेही नियोजन नाही. केवळ मेट्रो आणि उड्डाणपूल झाले म्हणजे शहराचा विकास होत नाही. येथील आमदार, खासदार निवडून येतात, त्यांच्याकडे कोणतेही व्हिजन नाही, नियोजन नाही. परिणामी शहराचा बोजवारा उडाला आहे. आपण शिक्षित-अशिक्षित आहोत का यापेक्षा आपण सुज्ञ आहोत का, याचा विचार होणे ही आजच्या काळाची गरज आहे.