पुणे: पसंत तसेच हुंडा दिला नसल्याच्या कारणावरून नववधूस 45 दिवसांत घराबाहेर काढणाऱ्या सासरच्यांनी सुनेस एकरकमी 45 लाख रुपये पोटगी देण्याची तयारी न्यायालयात दर्शविली. पत्नीनेही सासरच्यांविरोधातील कौटुंबिक हिंसाचारानुसार दाखल केलेले गुन्हे मागे घेतले. त्यानंतर, दाम्पत्यांनी परस्पर संमतीने केलेला घटस्फोटाचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला अन् कौटुंबिक हिंसाचारासह घटस्फोटाचा दावा अवघ्या एक वर्षात निकाली निघाला.
माधव आणि माधवी (दोघांची नावे बदलेली आहेत) यांचा विवाह 29 जानेवारी 2022 रोजी झाला. लग्नाच्या काही दिवसांनंतर लग्नात हुंडा दिला नसल्याच्या कारणावरून सासू, सासरा व नणंदेकडून विवाहितेचा छळ सुरू झाला. (Latest Pune News)
यादरम्यान, माधव यानेही ‘तू मला पसंत नव्हतीस, मला लग्न करायचे नव्हते, घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून मी लग्न केले,’ असे बोलून तिचा मानसिक छळ सुरू केला. त्यानंतर आरोपींनी विवाहितेस घराबाहेर काढले. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी ती परत नांदण्यास आली असता तिला घरात घेतले नाही.
माधव यानेही फोन घेणे व भेटण्यास टाळले. यादरम्यान, सासऱ्यांनी संपर्क साधत मुलाला दुसरे लग्न करायचे आहे, तुला नांदवायचे नाही, तू घटस्फोट दे म्हणून मानसिक त्रास दिला. याप्रकरणी, तिने भोसरी पोलिस ठाण्यात सासरच्यांविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
तपासानंतर, आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात, पत्नीतर्फे ॲड. प्रियंका काटकर आणि ॲड. रेश्मा सोनार यांनी काम पाहिले. समुपदेशादरम्यान पतीने एकरकमी 45 लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यास पत्नीनेही होकार दर्शवित कौटुंबिक हिंसाचारानुसार दाखल गुन्हा मागे घेण्याची तयारी दर्शविली. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला. तो न्यायालयाने मंजूर केला.