नानगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दौंड व शिरूर तालुक्याला जोडणार्या चौफुला-न्हावरा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, या कामाला म्हणावी तशी गती येताना दिसत नाही. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक व स्थानिकांची मोठी गैरसोय होत असून, या कामावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. या कामात 'गतिरोधक' म्हणून कोण आहे, याचीही चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. चौफुला-न्हावरा रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित आहे. या रस्त्याचे चांगले काम व्हावे, अशी मागणी या भागातून पुढे येत होती. धोकादायक व खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालक या रस्त्याने प्रवास न करता इतर मार्गांचा अवलंब करत होते.
दरम्यान, या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आणि काम सुरू झाले. त्याबद्दल वाहनचालक, प्रवासी व स्थानिकांना मोठा आनंद व्यक्त केला. मात्र, सध्याची परिस्थिती पाहाता काम संथगतीने सुरू असल्याने या कामाबद्दल नाराजीचा सूर निघत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पाऊस जरी कमी असला, तरी थोडा पाऊस झाला तरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर राडारोडा होत आहे. या राड्यारोड्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर छोट्या पुलांची कामे करण्यासाठी रस्ता खोदला आहे, त्या ठिकाणी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला तोडलेल्या झाडाच्या फांद्यादेखील तशाच पडून आहेत.
खोपोडी ते चौफुला या भागात तर खूपच संथगतीने काम दिसून येत आहे. रस्त्याच्या कामाला लागणारी यंत्रणादेखील कमी प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कामाचे नक्की कुठे घोडे अडले आहे तसेच या कामाला कोण गतिरोधक ठरतंय, अशा चर्चा केडगाव, पारगाव परिसरात सुरू आहेत.
हेही वाचा