प्रसाद जगताप
पुणे : दुचाकीस्वारांची घुसखोरी, बॅरिअर तोडून गावकर्यांची येणारी वाहने, जनावरांची घुसखोरी, अवजड वाहनांकडून 'लेन'च्या शिस्तीचा भंग, चारचाकींकडून स्पीड लिमिटची ऐशीतैशी यांसारख्या विविध समस्यांमुळे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर दरवर्षी कितीतरी अपघात होतात. ही अपघातांची मालिका संपणार कधी? असा सवाल वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात दै.'पुढारी'च्या वतीने नव्या एक्स्प्रेस वे ची (यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग) पाहणी करण्यात आली. त्यानंतर येथील विविध समस्या वृत्त मालिकेच्या माध्यमातून मांडण्यात आल्या. त्याचे विविध पातळीवर पडसाद उमटत असून, या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पुढाकार घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
शनिवारी (दि.21) दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीने पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे असा प्रवास केला. याच वेळी या मार्गावर दोन अपघात झाले होते. या महामार्गावर अपघातांची संख्या मोठी होत आहे. त्यामुळे येथील अपघात रोखण्यासाठी महामार्गाशी निगडित यंत्रणांनी आपले काम चोखपणे करणे, गरजेचे आहे, असे मत व्यक्त होत आहे.
एक्स्प्रेस वेवर 'लेन' शिस्तीचा भंग करण्याच्या सर्वाधिक घटना अवजड वाहनचालकांकडून होत असल्याचे दै. 'पुढारी'कडून करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान समोर आले आहे. यामुळेच येथे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. मात्र, महामार्ग पोलिसांकडून या अवजड वाहनचालकांवर कितीही कारवाई करण्यात आली तरीसुद्धा हे नियम पाळणार का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
एक्स्प्रेस वेवर अनेक वाहनचालक आपली वाहने रस्त्याच्या बाजूला उभी करीत असतात. असे बेकायदा पार्किंग करणेदेखील चुकीचे आहे. यामुळेसुद्धा अपघात होण्याची दाट शक्यता असते. एक्स्प्रेस वेवर सर्वाधिक नियमभंग करण्यात मालवाहतूक वाहनेच आघाडीवर आहेत. त्यामुळे अशा वाहनचालकांना प्रशिक्षणाची गरज असल्याचे समोर आले आहे. दिवसाला हजारो ट्रकच्या माध्यमातून एक्स्प्रेस वेवरून मालवाहतूक होत असते. दै.'पुढारी'चे वृत्त वाचले. मालवाहतूक करणार्या वाहनांकडून मोठ्या प्रमाणावर 'लेन'च्या शिस्तीचा भंग होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि लेन शिस्तीचे काटेकोर पालन व्हावे, याकरिता आम्ही पुढाकार घेणार आहोत. लवकरच सर्व मालवाहतूकदारांची बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्यात येतील.
– बाबा शिंदे, अध्यक्ष, चालक-मालक प्रतिनिधी संघ, महाराष्ट्र राज्य