खडकवासला: घाट माथ्यासह धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पानशेत (तानाजीसागर) पाठोपाठ शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर असलेल्या वरसगाव (वीर बाजी पासलकर जलाशय) धरणातुन गुरुवारी दुपारी पाणी सोडण्यात आले. खडकवासला धरणसाखळीत सायंकाळी पाच वाजता २७.५३ टीएमसी म्हणजे ९४.४६ टक्के साठा झाला होता.
गतवर्षीच्या तुलनेत धरण साखळीत जवळपास दोन टीएमसी अधिक पाणी आहे. गेल्या वर्षी ३० जुलै रोजी धरण साखळीत २५.७४ टीएमसी साठा होता. पानशेत व वरसगाव धरणांतून सोडण्यात येत असलेल्या पाण्याची भर पडत असल्याने खडकवासलातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या विसर्गात सायंकाळी ५७८३ क्सुसेकपर्यंत वाढ करण्यात आली.
पावसाचे प्रमाण वाढल्यास मुठा नदीत पुन्हा जादा पाणी सोडण्यात येणार आहे. नदीपात्रात नागरिकांनी उतरू नये, असे आवाहन खडकवासला जलसंपदा विभागाने केले आहे. घाटमाथ्यावरील दमदार पावसामुळे पानशेत व वरसगाव मध्ये पाण्याची आवक कायम आहे. पानशेत धरणातुन वीजनिर्मिती व वांजळवाडी सांडव्यातून २३१४ क्सुसेक पाणी सोडले जात आहे.
वरसगाव धरणाच्या शाखा अभियंता प्रतीक्षा रावण मारके म्हणाल्या, वरसगावची पाणीपातळी ९४ टक्क्यांहून अधिक झाल्याने लवकरच धरण शंभर टक्के भरणार आहे. धरणाच्या वीजनिर्मिती प्रकल्पाच्या सांडव्यातून दुपारी ६०० क्सुसेकने पाणी सोडण्यात आले.
बुधवारी (दि. २९) सकाळी सहा ते गुरुवारी (दि.३०) आज सकाळी सहा वाजेपर्यंत टेमघर येथे ६२, वरसगाव येथे २६ व टेमघर येथे २५, खडकवासलात केवळ १ मि.मी. पावसाची नोंद झाली. पानशेतची पातळी ९८ व वरसगाव धरणांची पाणीपातळी ९४ टक्क्यांहून अधिक आहे. गेली २४ तासात धरण साखळीत ०.२१ टीएमसीची वाढ झाली. जवळपास एवढेच पाणी खडकवासलातून सोडण्यात आले.