वेल्हे: पर्यटकांचे आकर्षण असलेल्या राजगड, तोरणा किल्ल्यांसह पानशेत, वरसगाव, गुंजवणी धरणपरिसर, मढे घाट धबधबा तसेच राजगड तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी रविवार (दि. 22) पासून पावसाळा संपेपर्यंत पर्यटनाला प्रशासनाने मनाई केली आहे. असे असले तरी सुटी असल्याने राजगड किल्ल्यावर दीड हजारांहून अधिक पर्यटकांनी गर्दी केली होती.
गडाचा परिसर पर्यटकांनी फुलून गेला होता तर दुसरीकडे गडावर पर्यटनास मनाई असा फलक लावून गडाचे पाहरेकरी, सुरक्षारक्षक आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी गडाच्या पायथ्याला पाहरा देत होते. (Latest Pune News)
पानशेत, वरसगावसह राजगड तालुका निसर्गसौंदर्य आणि पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध आहे. येथील तोरणा किल्ला, राजगड किल्ला, लिंगाणा, मढे घाट, गुंजवणी धरण, पानशेत धरण आणि वरसगाव धरण ही ठिकाणे वर्षाविहारासाठी पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहेत. मात्र, या तालुक्यातील डोंगराळ आणि दुर्गम भूभाग, तसेच पावसाळ्यातील अतिवृष्टी, धुके आणि निसरडे रस्ते यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.
धरण परिसरातील पाण्याचा प्रवाह, धबधबे आणि उंचावर असलेल्या मढे घाटासारख्या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर, पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023, कलम 163 अंतर्गत राजगड तालुक्यातील पर्यटनस्थळांवर 22 जून 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने राजगड, तोरणा किल्ल्यावर जाण्यास बंदीचे फलक गडांच्या पायथ्याला लावले आहेत. तसेच मढे घाट परिसरात रॅपलिंगला बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने सर्व नागरिकांना आणि पर्यटकांना केले आहे. असे असले तरी रायगड जिल्ह्यातील हद्दीवरील अतिदुर्गम व धोकादायक मढे घाट धबधब्यावर सकाळपासून तथाकथित साहसी पर्यटन केंद्राच्या वतीने साहसी क्रीडा खेळ सुरू होते. पर्यटकांना दोरखंड लावून दोन ते तीन हजार खोल दरीत सोडले जात होते.
रविवार सुटीचा दिवस असल्याने राजगड किल्ल्याकडे सकाळपासून हजारो पर्यटकांनी धाव घेतली होती. मनाई आदेश आल्याने पुरातत्त्व खात्याचे पाहरेकरी बापू साबळे, पवन साखरे, आकाश कचरे, विशाल पिलावरे गडाच्या पायथ्याला पाल खुर्द येथे पाहरा देत होते. दरम्यान पुरातत्व खात्याचे पाहरेकरी बापू साबळे म्हणाले, मनाई आदेश असूनही चोरून-लपून राजगडावर एक ते दीड हजार पर्यटक गेले. अनेक पायी मार्ग असल्याने पर्यटक गडावर जात आहेत.
पावसाळ्यातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणार्या जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत. पर्यटकांनी आपली आणि इतरांची सुरक्षा लक्षात घेऊन पर्यटनस्थळांना भेट देताना काळजी घ्यावी. या आदेशाची अंमलबजावणी न करणार्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.- विकास खरात, उपविभागीय अधिकारी, भोर
मनाई आदेश येण्यापूर्वी धबधब्यावर साहसी क्रीडा खेळ सुरू होते. यापुढे असे प्रकार करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.- निवास ढाणे, तहसीलदार, राजगड