पुणे

पुणे : दाैंड तालुक्यातील जिरेगावकरांवर जलसंकट!

अमृता चौगुले

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा

आज (दि.22) जागतिक जल दिन सर्वत्र साजरा होत असला तरी दौंड तालुक्यातील जिरेगावकरांची मात्र पाण्यासाठी चार महिन्यांपासून तारांबळ सुरू आहे. विशेषतः जनाई शिरसाई उपसा सिंचन विभागाकडे मागणी करूनही अद्याप पाणी मिळाले नसल्यामुळे जिरेगावकरांना कोणी पाणी देतं का पाणी, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

जिरेगाव (ता. दौंड) येथील कोरडाठाक असलेला तलाव. (छाया : अजय कांबळे)

जिरेगाव येथील पाण्याचा तलाव कोरडाठाक पडला आहे. डिसेंबर 2021 पासून पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. नागरिकांसह प्राणी, पक्षी व जनावरांचे पाण्यासाठी अतिशय हाल होत आहेत. संबंधित अधिकार्‍यांना याचे काही घेणेदेणे आहे असे दिसत नाही. अगदी हिवाळ्यापासून जिरेगावकर दुष्काळाच्या भयानक झळा सोसत आहेत.

पाण्याअभावी शेती, दूध, पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आले आहेत. जेवढे पाणी मिळाले त्यावर कसे तरी पिके वाढवली. मात्र, शेवटी पाणी मिळाले नसल्याने हातची पिके धोक्यात आली आहेत. ऊस जळून गेला आहे. पावसाळ्यात तलावात जमा होणारे पाणी व जनाई शिरसाई योजनेंतर्गत मिळणारे पाणी या पाण्याच्या स्रोतावर जनजीवन अवलंबून आहे. शेतीसाठी, दैनंदिन कामासाठी, जनावरांना पिण्यासाठी या तलावातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. पाणी नसल्याने जिरेगावच्या वाड्यावस्त्यांवरील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पाण्याची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करीत तीन ते चार महिन्यांपासून हा प्रश्न भिजत ठेवला आहे. अशा पाण्याच्या महाभयंकर स्थितीत जागतिक जल दिन साजरा करण्याऐवजी जिरेगावकरांना प्रशासनाच्या नावाने बोंब मारण्याशिवाय पर्याय नाही.

तोंडचे पाणी पळाले.

तलावात पाणी नाही, विहीर, कूपनलिका, बंधार्‍यांना घरघर लागली असून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. जनाई शिरसाई योजनेतून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. यापोटी धनादेश संबंधित विभागाला देण्यात आला आहे. मात्र, तलावापर्यंत पाणी पोहचले नसल्याने जिरेगावकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT