पुणे: राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांनी विद्यांजली २.० पोर्टलवर १०० टक्के नोंदणी पूर्ण करून ३१ जुलैपर्यंत शाळेच्या आवश्यकतेनुसार साहित्य आणि सुविधा मागणी नोंदवावी, असे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी दिले आहेत.
या संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, डायट प्राचार्य आणि संबंधित अधिकाऱ्यांना परिपत्रक जारी केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी-२०२०) अंतर्गत लोकसहभाग आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारने विद्यांजली २.० हे स्वयंसेवक व्यवस्थापन पोर्टल विकसित केले आहे.
या पोर्टलद्वारे भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय, माजी विद्यार्थी, निवृत्त अधिकारी, तज्ज्ञ, गृहिणी, स्वयंसेवी संस्था तसेच नोंदणीकृत संस्थांना शाळांच्या विकासासाठी विनामूल्य योगदान देता येणार आहे.
याशिवाय, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) मॉड्यूलद्वारे कंपन्या आणि विविध संस्थांकडून शाळांसाठी डिजिटल पायाभूत सुविधा, क्रीडा साहित्य, मूलभूत सुविधा, प्रयोगशाळा आदींसाठी निधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे.
जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिमाहीतील सीएसआर प्रकल्पांसाठी शाळांनी २२ ते ३१ जुलै या कालावधीत आपल्या गरजा पोर्टलवर नोंदवायच्या आहेत. विद्या प्राधिकरणाने जिल्हा व तालुका नोडल अधिकाऱ्यांना सर्व शाळांची नोंदणी पूर्ण करून आवश्यक साहित्याच्या मागण्या वेळेत पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश दिले आहेत.