वेल्हे: राजगड तालुक्यातील पुणे-पानशेत मार्गावरील पानशेत वसाहतीजवळील 68 वर्षे जुना पूल वाहतुकीसाठी तत्काळ बंद करण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी दिले आहेत. पुलाची स्थिती अत्यंत धोकादायक झाल्याने जड तसेच हलक्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालानुसार, सन 1958 मध्ये जलसंपदा विभागामार्फत बांधण्यात आलेल्या या पुलाची संरचनात्मक स्थिती अत्यंत खराब झाली आहे. पुलाची दुरुस्ती तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. येणाऱ्या पावसाळ्यात मुठा नदीच्या विसर्गामुळे आणि पुलाच्या जीर्ण अवस्थेमुळे दुर्घटनेची शक्यता वाढल्याने सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, 77 मीटर लांबीच्या नवीन पुलासाठी 814 लाख रुपयांचा प्रस्ताव नाबार्डकडे पाठविण्यात आला आहे.
मात्र, मंजुरी आणि बांधकाम पूर्ण होईपर्यंत जुना पूल बंदच राहणार आहे. पोलिस अधीक्षकांच्या अहवालानुसार, वेल्हे पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी स्थानिक ग््राामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. मात्र, सरपंच व सदस्यांनी पूल बंद करण्यास संमती दिली नव्हती. कुरण, पानशेत, वांजळवाडी तसेच मोसे खोऱ्यातील सुमारे 15 गावांसाठी हा पूल दळणवळणाचा महत्त्वाचा दुवा आहे. शिक्षण, रोजगार, धान्य वितरण, आरोग्य सेवा आणि प्रशासकीय कामांसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात या पुलाचा वापर करतात.
पूल बंद झाल्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागणार असून, पानशेत धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील गावांपर्यंत पोलीस आणि आपत्कालीन सेवा पोहोचण्यासही अडचणी निर्माण होण्याची शक्यता ग््राामस्थांनी व्यक्त केली आहे.
जिल्हा प्रशासनाने पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत. लवासा-वरसगाव धरण परिसरातून पानशेतकडे जाणारी वाहने निळकंठेश्वर रस्ता, डावजे, कोंढूर, बहुली, कातवडी, मांडवी, कुडजे, खडकवासला धरणमार्गे गोऱ्हे-खानापूर मार्गाने वळविण्यात येणार आहेत.
तर पानशेत-वेल्हे भागातून लवासा, वरसगाव आणि पुण्याकडे जाणारी वाहने कुरण खुर्द, रानवडी, सोनापूर, खानापूर, गोऱ्हे, खडकवासला धरणमार्गे कुडजे, मांडवी, कातवडी, बहुली, कोंढूर, डावजे आणि निळकंठेश्वर मार्गाने वळविण्यात येणार आहेत.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ठिकाणी बॅरिकेडिंग आणि सूचना फलक उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, पूल बंद झाल्याने स्थानिक नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि रुग्णवाहिका सेवांवर परिणाम होणार असून नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.