धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथील कॅनॉल लगत विविध व्यावसायिक व भाजी विक्रेत्यांसाठी भाजी मंडई व पत्राशेडचे गाळे २०१९ साली तयार करण्यात आले होते. या गाळ्यांमध्ये भाजी विक्रेत्यांनी व व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती.
दरम्यान त्यावेळी सहा महिने ही भाजी मंडई सुरू होती. परंतु विक्रेते येथील रस्त्यावर बसु लागल्यामुळे ही भाजी मंडई ओस पडली. येथील गाळा धारकांचे व्यवसाय बंद पडले.त्यांना आपले घर चालवणे देखील मुश्किल झाले. यामुळे त्यांनी सहा महिन्यातच येथील गाळ्यात बसने सोडुन देऊन आपली दुकाने छत्रपती संभाजी महाराज चौका पासून कॅनॉल पुलावरील शरदचंद्रजी पवार ई लर्निंग स्कुल परिसरात रस्त्यावरील दोन्ही बाजुला पद पथावर थाटली व त्या ठिकाणी व्यवसाय करू लागले.
यामुळे महापालिकेच्या वतीने त्यांना देण्यात आलेले गाळे व भाजी मंडई ओस पडून धुळ खात पडलेली आहे. त्यामुळे जनतेचे पैसे पाण्यात गेले की काय अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे. या ठिकाणी सत्तर पत्रा शेड असलेले गाळे तयार करण्यात आले आहेत. या पैकी चाळीस गाळे धारकांना महापालिकेचा परवाना आहे. बाकी उर्वरित अनधिकृत आहेत.
हे चाळीस जण प्रत्येक वर्षी छत्तीस हजार रुपये महापालिकेचे भाडे देत आहेत. या बाबत महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विजय कुमार वाघमोडे यांना विचारले असता त्यांनी हे बंद असलेले गाळे पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. वडगाव बुद्रुक मधील मुख्य चौकात रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांमुळे सतत मोठी वाहतुक कोंडी होत होती. नागरिकांना येथून चालणे देखील मुश्किल होत होते. यासाठी ही भाजी मंडई येथुन स्थलांतरित करण्यात आली.येथील सर्व भाजी विक्रेत्यांसाठी कॅनॉल लगत गाळे तयार करून देण्यात आले. हा महिने सर्व भाजी विक्रेते यांनी या गाळ्यात त्यांची दुकाने सुरू केली.
दरम्यानच्या काळात रस्त्यावर व पद पथावर बेकायदेशीर पणे इतर भाजी विक्रेते बसु लागले. याचा फटका या सर्व परवाना धारक व गाळ्यातील इतर विक्रेत्यांना बसला. त्यांची या बेकायदेशीर व अनाधिकृत विक्रेत्यांमुळे दुकाने ग्राहक नसल्याने बंद पडू लागली. त्यामुळे नाईलाजाने सर्व गाळे धारक व्यावसायिक पुन्हा रस्त्यावर व पद पथावर बसले आहेत. यामधील चाळीस जण महापालिकेला नियमितपणे भाडे देत आहेत. महापालिकेच्या या गाळ्यात व्यावसायिकांनी पुन्हा आपले व्यवसाय सुरू करण्याची गरज आहे. यामुळे रस्त्यावर सतत होणारी वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होईल.