पुणे: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) घेतलेल्या 2025 च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकल्पातील 19 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे या यशस्वी विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थी हे दिव्यांग असून, हे त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत. मनोबलचा विद्यार्थी असलेला दृष्टिबाधित रवी राज यांनी दिव्यांग उमेदवारांमध्ये देशात अव्वल ठरत देशात 20 वा क्रमांक ( अखठ 20) मिळवला आहे.
दीपस्तंभ फाउंडेशनच्या ‘मनोबल’ या राष्ट्रीय प्रकल्पात पुणे, जळगाव आणि दिल्ली येथे विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल, ॲक्सेसिबल शिक्षण, तंत्रज्ञानाधारित सुविधा आणि विशेष समुपदेशनाच्या माध्यमातून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अंध, कर्णबधिर, अस्थिव्यंग, अशा विविध प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजांनुसार या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. देशातील 16 राज्यांमधील 600 विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठी विनामूल्य शिक्षण व प्रशिक्षण दिले जाते.
या विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर मुळे, कुणाल कुमार, सुप्रिया देवस्थळी, आयुषी डबास, विश्वजित यादव आणि मिलिंद पाटील (विभाग प्रमुख- मनोबल) यांच्यासह 40 अधिकाऱ्यांच्या टीमने मार्गदर्शन केले, अशी माहिती मनोबलचे ॲकॅडमिक हेड अमोल लंके यांनी दिली.
दीपस्तंभ मनोबलच्या या यशाबद्दल बोलताना संस्थापक यजुर्वेन्द्र महाजन म्हणाले, “दिव्यांग विद्यार्थ्यांचे नागरी सेवा परीक्षेतील हे देदीप्यमान यश समस्या क्षमतेची नसून, संधी आणि प्रणालीची असते ही बाब सिद्ध करते, असे मला वाटते. संविधानाने अपेक्षित समान संधी, सुलभ शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन दिल्यास दिव्यांग युवक-युवती विकसित भारताचे नेतृत्व करू शकतात.”
यशस्वी विद्यार्थ्यांपैकी रेणुका केकण म्हणाल्या, “मी 2023 पासून दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल प्रकल्पाशी जोडलेली असून, येथे निवासी विद्यार्थी म्हणून तयारी करत होते. वैयक्तिक मार्गदर्शन, अभ्यासासाठी अनुकूल वातावरण आणि सतत प्रेरणा देणारे शैक्षणिक पाठबळ यामुळे यूपीएससीसारख्या परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर मला योग्य दिशा आणि आत्मविश्वास मिळाला.”