पुणे

राज्यात अवकाळीचा मुक्काम; ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस रविवार, 19 मेपर्यंत मुक्काम ठोकणार आहे. दरम्यान, त्यानंतर हा पाऊस थांबण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत अवकाळी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार कोसळणार आहे. विशेषत:, सिंधुदुर्ग, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांना हवामान विभागाने 'यलो अलर्ट' जारी केला आहे.

राज्यात सुरू असलेल्या अवकाळीचा वाढलेला मुक्काम थांबण्याची चिन्हे आहेत. कारण, कर्नाटक ते पूर्व विदर्भ या भागापर्यंत असलेला द्रोणीय स्थितीचा प्रभाव कमी झाला आहे. मात्र, अरबी समुद्राच्या मध्यभागापासून ते येमेनपर्यंत चक्रीय स्थिती आहे. याचा परिणाम कोकण किनारपट्टीवर होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांत वादळी वार्‍यांसह जोरदार, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात तुरळक पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमाल तापमानात घसरण

राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे बहुतांश भागांतील कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. गुरुवारी राज्यात सर्वाधिक तापमान जळगावमध्ये 42 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले आहे. दरम्यान, किमान तापमानातही घट झाली आहे. त्यामुळे हवेत गारवा तयार झाला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT