पुणे : पुढारी वृत्तसेवा : रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून पोस्ट कार्यालयाने राखी पाठविण्यासाठी विशेष राखी पाकीट तयार केले आहे. या पाकिटामधून राखी पाठवावी, असे आवाहन पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी केले आहे. या विशेष पाकिटाची किंमत केवळ दहा रुपये ठेवण्यात आली आहे.
या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून प्रिय बांधवांना पोस्ट विभागाने तयार केलेल्या विशेष राखी पाकिटातीन राख्या पाठविण्याची सोय पोस्ट विभागाने सुरू केली आहे. भाऊ-बहिणींमधील अतूट नाते साजरे करण्यासाठी ग्राहकांशीही तितकेच अतूट विश्वासाचे नाते असलेल्या पोस्ट विभागाने निर्मिलेले हे राखी पाकीट म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका पाकिटाची किंमत दहा रुपये आहे, शिवाय या पाकिटासाठी दर्जेदार कागद वापरण्यात आलेला आहे. डिजिटल शुभेच्छांच्या युगात प्रत्यक्ष मिळालेली राखी म्हणून तिचे महत्त्व वेगळे आहे. बहिणीने मोठ्या प्रेमाने खरेदी केलेली आणि तितक्याच निगुतीने टपाल विभागाच्या राखी पाकिटामधून पाठविलेली राखी भावापर्यंत वेळेत पोहचावी म्हणून टपाल विभागाच्या पुणे क्षेत्राने विशेष योजना तयार केली आहे, असे जायभाये यांनी सांगितले.
या योजनेबाबत माहिती देताना पुणे विभागाचे पोस्ट मास्तर जनरल जायभाये म्हणाले की, दरवर्षी या राखी पाकिटांना प्रचंड मागणी असते. ग्राहक त्यांच्या राख्या स्पीड पोस्टने देखील पाठवू शकतात, ज्यामुळे अगदी परदेशातही राख्या अतिशय जलद आणि वेळेवर पोहचू शकतील. या पाकिटावर लिहिलेल्या राखी या शब्दामुळे त्याचे सॉर्टिंग करणे सोपे जाते; शिवाय वेळेत राख्या पोहचविण्यासाठी मोठ्या टपाल कार्यालयात पिन कोड नमूद केलेल्या पेट्या ठेवण्यात आल्या आहेत आणि राखी पाकीट वेळेत पोहचविण्यासाठी सर्व पोस्ट ऑफिसमध्ये सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
योजनेचा लाभ घ्या
पुणे क्षेत्रातील पुणे, अहमदनगर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील सर्व नागरिकांनी टपाल खात्याच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोस्टमास्तर जनरल जायभाये यांनी केले आहे.
हेही वाचा :