शिवाजी शिंदे
पुणे: राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या महिला स्वयं-सहाय्यता समूहांनी तयार केलेल्या वस्तू व उत्पादनांना हक्काची तसेच कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी राज्यात ‘उमेद मॉल’सुरू होणार आहेत. हे मॉल प्रायोगिक तत्वावर राज्यातील 13 जिल्ह्यामध्ये सुरू होणार असून त्यामध्ये पुणे ,नागपूर ,नाशिक , छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर ,अहमदनगर ,जळगाव ,सातारा , लातुर, नांदेड , ठाणे या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना शहरातील व शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, मध्यस्थांवर अवलंबन कमी करणे आणि महिलांचे उत्पन्न वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. हे उमेद मॉल शहरात, जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी उभारले जाणार आहेत. या मॉल’ची मुख्य उद्दिष्टे महिला उत्पादनांना थेट विक्रीसाठी कायमस्वरूपी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे, ग्रामीण महिलांना उद्योजकतेसाठी प्रवृत्त करणे, स्थानिक, पारंपरिक व नैसर्गिक उत्पादनांचा ब्रँड म्हणून महिलांचे उत्पन्न, स्वावलंबन व सामाजिक दर्जा वाढवणे हा आहे.
‘उमेद मॉल’मध्ये विक्रीसाठी उपलब्ध उत्पादने ही
महिला स्वयं-सहाय्यता समूहांकडून तयार केलेली असणार आहेत. त्यामध्ये ( उदा.) हस्तकला व हातमाग उत्पादने, रेडीमेड कपडे, साड्या, भरतकाम वस्तूे स्थानिक अन्नपदार्थ पापड, लोणची, मसाले, सेंद्रिय उत्पादने, साबण, अगरबत्ती, कापडी पिशव्या÷ भेटवस्तू, सजावटीच्या वस्तू, आयुर्वेदिक / नैसर्गिक उत्पादने यांचा समावेश असणार आहे.
‘उमेद मॉल’चे व्यवस्थापन असणार महिलांकडे
ग्रामीण भागातील महिलांच्या स्वयंसहाय्यता समुहाकडे या उमेद मॉलचे व्यवस्थापन असणार आहे. तसेच उत्पादनाची गुणवत्ता महिलाच ठरविणार आहेत.त्या संबधित उत्पादनांची किंमत ठरवणे यासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येणार आहे. ग्रामीण महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा मजबूत पाया आहे. हा ‘ उमेद मॉल’चा उपक्रम यशस्वी झाल्यास भविष्यात राज्यभर मोठ्या प्रमाणात अशा मॉल्सचे जाळे उभे राहण्यात येणार आहे.
या जिल्ह्यांची निवड का?
महिला स्वयं-सहाय्यता समूहांची संख्या व सक्रियता जास्त या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर महिला स्वयं-सहाय्यता समूह स्थापन झालेले आहेत. हे समूह उत्पादन, बचत-गट व्यवहार, उद्योजकता व विपणन क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत असल्यामुळे त्यांच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध करून देणे व्यवहार्य ठरते.
शहरी ग्राहकवर्ग व पर्यटन / व्यापार केंद्रे उपलब्ध निवडलेले जिल्हे हे महत्वाची शहरे, पर्यटन स्थळे व व्यापारी केंद्रे असल्याने येथे खरेदी क्षमता असलेला ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळे ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना स्थिर व नियमित मागणी निर्माण होण्यास मदत होते.
स्थानिक व पारंपरिक उत्पादनांची वैविध्यपूर्ण श्रेणी या जिल्ह्यांमध्ये हातमाग, हस्तकला, स्थानिक अन्नपदार्थ, सेंद्रिय व पारंपरिक उत्पादने यांची समृद्ध परंपरा आहे. त्यामुळे ‘उमेद मॉल’मध्ये वैविध्यपूर्ण, दर्जेदार व स्थानिक ओळख निर्माण करणारी उत्पादने उपलब्ध करून देणे शक्य होते.
दळणवळण, लॉजिस्टिक व विपणन सुविधा तुलनेने चांगल्या
या जिल्ह्यांमध्ये रस्ते, रेल्वे, वाहतूक व्यवस्था, गोदामे, बाजारपेठा व विपणन साखळी तुलनेने विकसित आहे. त्यामुळे उत्पादनांची साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री कार्यक्षमतेने करता येते आणि महिलांच्या उत्पादनांना मोठ्या बाजारपेठेत पोहोचवणे सुलभ होते.
महिला स्वयं-सहाय्यता समूहांचे मजबूत जाळे, शहरी बाजारपेठ, उत्पादनांची विविधता आणि उत्तम दळणवळण सुविधा या कारणांमुळे पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सुमारे 6 लाखहून अधिक स्वयं सहाय्यता समूह कार्यरत आहेत आणि हे गट 60 लाखाहून जास्त ग्रामीण महिलांना संघटित करतात, जे विविध सामाजिक आणि आर्थिक उपक्रमांमध्ये सहभागी आहेत.