Ujani Dam Fishing Contract Stay
पुणे: उजनीचा प्रस्तावित ठेका कायमचा रद्द करण्याच्या मागणीसाठी पुण्यात सिंचन भवन परिसरात उपोषणास बसलेल्या मच्छीमारांची दखल न घेतल्याने संतापलेल्या मच्छीमार महिलांनी थेट कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना (एमडी) त्यांच्याच केबिनमध्ये घेराव घालून टेबलवर बांगड्या फोडल्या.
या अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्वांची एकच धांदल उडाली त्यानंतर खुद्द कार्यकारी संचालक यांनी संयम दाखवत महिलांना आपला प्रश्न व्यवस्थित मांडल्यास सोडवला जाईल, असे सांगत वादावर पडदा टाकला. त्यानंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवला तर बाहेर मच्छीमारांनी गेटवर मोठ्या संख्येने ठिय्या मांडला. त्यामुळे काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मच्छीमार प्रतिनिधींनीदेखील जमावाला शांत करण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
दरम्यान, कार्यकारी संचालक धनंजय धुमाळ यांनी उपस्थित शिष्टमंडळाशी चर्चा करून उजनीच्या प्रस्तावित ठेक्याला मंत्री महोदयांनी दिलेली स्थगितीवर अधिकृत पत्र देत स्थानिक मच्छीमारांना विचारात घेऊनच पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी पत्र दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. उजनीतील मासेमारी व्यवसायावर स्थानिक पारंपरिक मच्छीमार,भूमिपुत्र, पारधी, मागासवर्गीय कुटुंबाचा तसेच व्यापारी, आडतदार, जाळी दुकानदार, हॉटेल व्यावसायिक, तोडाई, चालक-मालक, कामगार, बर्फ कारखानदार आदिनाचा रोजगार व उदरनिर्वाह अवलंबून आहे. असलेला रोजगार काढून घेतला जाणार असल्याने मच्छीमारांची सतत आंदोलने सुरू होती.
दरम्यान, उजनी मच्छीमार बचाव अभियानाचे मच्छीमार चंद्रकांत भोई, संजय सल्ले, बलभीम भोई, नवनाथ परदेशी, अनिता नगरे, दीपाली डिरे हे दि. १५ सप्टेंबर पासून उपोषणास बसले होते. आंदोलन बाळासाहेब काळे, अनिल नगरे, दत्तात्रय व्यवहारे, विक्रम शेलार, उज्ज्वला परदेशी, बाळासाहेब गाडेकर, शरद गलांडे, लतीफ काळे, संजय दरदरे, बापूराव भोई, अमोल पतुरे, युवराज नगरे, उत्तम दरदरे आदींच्या मार्गदर्शनाखाली छेडण्यात आले. पाठिंबा देण्यास आलेल्या मच्छीमारांना बालाजी ग्रुपने तीन दिवस अन्न व पाणी पुरवले.
सोलापूर विभागाची खरडपट्टी...
दरम्यान, संतप्त महिलांनी संचालक धुमाळ यांच्या कार्यालयात आंदोलन केल्यानंतर मच्छीमार बचाव अभियानाला दिलेल्या पत्रात महामंडळाने सोलापुरचे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता (वि.प्र) यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. व हिंसक आंदोलनास त्यांना जबाबदार धरले आहे. आपल्या स्तरावर ईओआय ला मंजुरी देऊन, प्रसिद्ध केली आहे, मात्र आंदोलनकर्त्यांना हा विषय महामंडळाचा आहे, असे सांगून त्यातून अंग झटकून घेतले व त्यामुळे आंदोलन कर्त्यांचा गैरसमज होऊन कार्यकारी संचालक यांच्या कक्षामध्ये हिंसक आंदोलचा प्रयत्न झाल्याचे नमूद करत. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन स्थगित करण्याबाबत महामंडळाने पत्राद्वारे सूचवले ते याकडेही दुर्लक्ष केले हे योग्य नसल्याचे पत्रात म्हटले आहे.