पुणे : पुढारी वृत्तसेवा
पर्यटनाचा आनंद घेताना पूर्वतयारी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. नियोजन चुकले, तर पर्यटनाचा आनंद घेता येत नाही. विशेषत: एकट्याने पर्यटनाला जाताना अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
लोणावळा येथे पर्यटनासाठी गेलेल्या दिल्लीतील बेपत्ता इंजिनिअर तरुणाचा मृतदेह घनदाट जंगलात आढळला. रस्ता शोधत असताना तो दरीत कोसळल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या दुर्घटनेमुळे दर्या खोर्यात, जंगलात एकट्याने फिरण्याचा आनंद लुटताना सुरक्षिततेचा विचार करणे अत्यंत आवश्यक असल्याची बाब पुढे आली आहे.
देशातीलच नाही, तर जगभरात सर्वाधिक पर्यटक निसर्ग पर्यटन करतात. यासोबतच गोवा, मुंबईतील बीचसह समुद्रकिनारी पर्यटन करणार्यांची संख्याही कमी नाही. या ठिकाणी पर्यटनाला जाताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते. त्याबरोबरच पर्यटनासाठी योग्य ठिकाण व वेळ निवडण्याचे मोठे आव्हान पर्यटकांपुढे असते. ठिकाण निवडले, तरी संपूर्ण माहिती जवळ बाळगणे गरजेचे आहे, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.
निसर्ग पर्यटन उन्हाळा किंवा हिवाळ्यात केले जाते. निसर्ग पर्यटनाला जाताना सोबत कोणत्या वस्तू घेऊन जाव्यात, हे त्या ठिकाणावर व ऋतूवर अवलंबून असते. निसर्ग पर्यटनाला जाताना सोबत कॅमेरा, ज्या ठिकाणी जायचे आहे तेथील नकाशा, तसेच ठिकाणाबद्दल पूर्ण माहिती असणे, ज्या ठिकाणी आपण पर्यटनाला जातो, त्याच्या आजूबाजूला आणखी सुंदर पर्यटनस्थळे असू शकतात. जी फारशी प्रसिद्ध नसतात. त्याचीही माहिती घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व रिसॉर्टवर येणार्या पर्यटकांची काळजी घेतली जाते. प्रत्येक पर्यटकाला कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत सूचना देऊन संबंधितांकडे रिसॉर्टबरोबरच जवळच्या पोलिस स्टेशन आणि डॉक्टरांचा नंबरही दिला जातो. एकट्याने पर्यटनाला आल्यास सर्व सामग्री तसेच नातेवाइकांच्या संपर्कात सातत्याने राहणे गरजेचे आहे.
– दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
https://youtu.be/m5yyfqkYqY4