मंचर: आंबेगाव तालुक्यातील मंचर-घोडेगाव रस्त्यावर पळस्टिका फाटा येथे स्कूटी आणि खासगी आराम बसची धडक होऊन झालेल्या अपघातात स्कूटीवरील तीन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 15) दुपारी घडली. मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी तिघांना आणले असता तिघांचाही मृत्यू उपचारांपूर्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
अथर्व संदीप खमसे (वय 18), गणेश रामभाऊ असवले (वय 18) आणि भारत सुदाम वाजे (वय 18, तिघेही रा. कोळवाडी, ता. आंबेगाव) अशी मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. उत्तर प्रदेश येथील खासगी प्रवासी बस ही भीमाशंकरच्या दिशेने जात होती. त्या वेळी स्कूटी घोडेगाववरून मंचरच्या दिशेने येत होती. (Latest Pune News)
या स्कूटीवर कोळवाडी गावातील अथर्व खमसे, गणेश असवले आणि भारत वाजे हे तिघे होते. दरम्यान, घोडेगाव शहराजवळ असणार्या पळस्टिका फाट्यावर बस व स्कूटीची धडक झाली. धडकेनंतर खासगी बसने स्कूटीला काही अंतर फरफटत नेले.
यामध्ये स्कूटीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. अपघात झाल्यानंतर मंचर येथील देवेंद्रशेठ शहा फाउंडेशन आणि घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाच्या खासगी रुग्णवाहिकेतून या तीनही युवकांना गंभीर जखमी अवस्थेत मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी आणण्यात आले. त्या वेळी तिघांचाही मृत्यू उपचारांपूर्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मंचर उपजिल्हा रुग्णालयात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे स्वीय सहायक रामदास वळसे पाटील, देवेंद्रशेठ शहा फाउंडेशनचे अध्यक्ष निळूभाऊ काळे यांनी भेट देऊन मृत मुलांच्या नातेवाउकांचे सांत्वन केले. मंचर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. घोडेगाव पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या अपघाताचे नेमके कारण समजले नाही.