ज्ञानेश्वर बिजले
पुणे : राज्यात सूक्ष्म सिंचनाचा वापर गेल्या दशकात वाढत असून, या पद्धतीने सुमारे दहा लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके व फळबागांना पाणी दिले जाते. यामुळे पाण्याची तर बचत झालीच, आणि शेतमालाच्या उत्पादनातही वाढ झाली. आता शासनाच्या अनुदानामुळे सूक्ष्म सिंचनाला शेतकर्यांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.
जागतिक जल दिनानिमित्त (दि. 22 मार्च) राज्यातील सिंचनासाठी पाणी देताना शेतकरी सुक्ष्म सिंचनाचा किती वापर करतात त्याचा आढावा घेतला. त्यावेळी ठिबक व तुषार पद्धतीने पिकांना पाणी देण्याला शेतकरी प्राधान्य देत असल्याचे दिसून आले. योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने खर्चाच्या 80 ते 90 टक्के अनुदान यंदा मिळत आहे. त्यामुळे शेतकरीही त्याकडे वळू लागले आहेत.
केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 45 ते 55 टक्के अनुदान दिले जाते. त्याच प्रमाणात राज्य सरकारनेही यावर्षीपासून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत अनुदान दिले. यंदा सहा लाख 36 हजार शेतकर्यांची यासाठी निवड करण्यात आली. त्यांच्यापैकी 1.87 लाख शेतकर्यांनी प्रत्यक्ष संच त्यांच्या शेतात बसविले. एका संचासाठी दहा हजारांपासून ते सहा लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. शेतकर्याची जागा, पीकपद्धती, पिकातील अंतरानुसार खर्चाचे प्रमाण ठरते. त्यांनी केलेल्या खर्चाच्या प्रमाणात त्यांना अनुदानाची 80 ते 90 टक्के रक्कम मिळते. जास्तीत जास्त पाच हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी हे साह्य दिले जाते. एक संच सात वर्षांपर्यंत वापरला जातो.
फलोत्पादन विभागाचे कृषी उपसंचालक संजय काचोळे दै. 'पुढारी'ला माहिती देताना म्हणाले, 'सूक्ष्म सिंचनामुळे जमीन खराब होत नाही. पाण्याची बचत होते. पिकांच्या मुळांना पाणी दिल्यामुळे शेतीमालाची प्रत चांगली येते. द्राक्षे, डाळिंब या फळबागा ठिबकशिवाय दिसतच नाहीत. 1985-86 पासून ही योजना राबविण्यात येत असली, तरी गेल्या दशकात त्याचा वापर वाढला. राज्यात 175 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. त्यापैकी दहा लाख हेक्टर क्षेत्र गेल्या सात वर्षांत सूक्ष्म सिंचनाखाली आले आहे. विहीर, भूजल, कालवे, शेततळे अशा विविध माध्यमातील पाणी यासाठी वापरले जाते.
पश्चिम महाराष्ट्र व जळगावमध्ये सुरवातीच्या काळात सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढला. आता विदर्भ व मराठवाड्यात शेतीत वापर वाढू लागला आहे. फळबागांसोबत कापूस, ऊस, भाजीपाला यांच्यासाठी ठिबक सिंचनाचा, तर सोयाबीन, हरभरा या पिकांसाठी तुषार सिंचनाचा वापर वाढला आहे.
– संजय काचोळे, कृषी उपसंचालक, फलोत्पादन.