खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नवीन कात्रज बाह्यवळण महामार्गावरील आंबेगाव खुर्द जांभूळवाडी येथील तलावात मैलापाणी, रासायनिक द्रव्यांसह जलपर्णीचे साम्राज्य पसरले आहे. विषारी पाण्यामुळे जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या तलावाला कोणी वाली उरला नाही. जलपर्णीपासून सुटका होण्याची तहानच जणू या तलावाला आहे.
तलावाची तातडीने स्वच्छता करावी; अन्यथा तीव— आंदोलनाचा इशारा स्थानिक आंबेगाव खुर्दचे माजी सरपंच अमर चिंधे व नागरिकांनी दिला आहे. नव्याने पालिकेत समावेश करण्यात आलेल्या आंबेगाव खुर्द, जांभुळवाडी, आंबेगाव बुद्रुक परिसरातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून जांभुळवाडी तलावाचा विकास होणे गरजेचे असताना प्रदूषणासह जलपर्णीच्या विळख्यात तलाव अडकला आहे. दिवसेंदिवस तलावाचे विद्रूपीकरण झाले आहे. पाणी विषारी बनले आहे.
ग्रामपंचायत काळात जांभुळवाडी कोळेवाडी, आंबेगाव खुर्द परिसरातील तीव— पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाटबंधारे विभागाने लाखो रुपये खर्च करून हा तलाव बांधला. शेतीसह हजारो नागरिकांची तहान तलावामुळे भागत होती. मात्र, तलावाच्या चौहोबाजूला प्रचंड बांधकामे, नागरी वस्त्यांचे जाळे पसरले. तेव्हापासून तलावाचे प्रदूषण वाढले आहे.
जलपर्णी, दूषित पाण्यामुळे तलावाची गटारगंगा झाली आहे. तलावाचा ताबा महापालिकेकडे देण्यात यावा, यासाठी पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार केला. परंतु, पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत आहे. संबंधित अधिकार्यांना वेळोवेळी निवेदने देऊनही दखल घेत नाहीत. तलावाच्या चोहूबाजूने अतिक्रमणांचा विळखा पडलेला आहे.
– अमर चिंधे, माजी सरपंच