Admission process for degree courses after 12th
पुणे: महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी (दि. 5) बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. निकालात यंदा घट झाल्यामुळे पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या पात्रता गुणांमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शहरातील विद्यापीठे, स्वायत्त महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, निकाल जाहीर झाल्याने पदवी अभ्यासक्रमाचे वर्गही यंदा लवकर सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.उच्च शिक्षणाकडे जाण्यासाठी बारावीचा टप्पा महत्त्वाचा असतो. (Latest Pune News)
बारावीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी उच्च शिक्षणात पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांसह अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक असतात.
परंतु, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. राज्यात या परीक्षांची प्रक्रिया राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलकडून राबवण्यात येत आहे. तसेच, विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह खासगी विद्यापीठेही प्रवेश परीक्षा घेतात. या प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर महाविद्यालयांतील कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित महाविद्यालयांच्या वेबसाईटवरून विद्यार्थ्यांना प्रवेशाचे अर्ज भरावे लागतात.
त्यानंतर संबंधित महाविद्यालयांकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जाते. त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यावा लागतो. दरवर्षीपेक्षा बारावीचा निकाल लवकर लागल्यामुळे आणि प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू झाल्यामुळे यंदा दरवर्षीच्या तुलनेत प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदा बारावीचा निकाल कमी झाल्याने पात्रता गुणांमध्ये एक ते दोन टक्के घट होऊ शकेल. तसेच, निकाल लवकर जाहीर झाल्याने पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचे प्रवेश दरवर्षीच्या तुलनेत यंदा लवकर सुरू झाले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचा कल पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांपेक्षा कौशल्य शिक्षणाकडे जास्त असल्याचे चित्र दिसत आहे.-डॉ. ज्ञानदेव निटवे, विभागप्रमुख, वाणिज्य आणि व्यवस्थापन विभाग, पुणे विद्यार्थिगृहाचे, कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय.