गणेश खळदकर
पुणे: राज्य परीक्षा परिषदेमार्फत रद्द करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीचा पेपर आता थेट सप्टेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. संबंधित परीक्षेच्या प्रश्नपत्रिका समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यामुळे आता लगेच संबंधित परीक्षा घेता येणे शक्य नाही. तसेच संबंधित परीक्षा आता ऑनलाइनच घ्यावी का? यासंदर्भात खलबते सुरू असल्याची माहिती परीक्षा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा रविवारी (२८ जून) आयोजित केली होती. परंतु २७ जूनलाच भिवंडी येथे पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे परीक्षा पारदर्शकपणे करण्यासाठी, तसेच पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे. परंतु, आता परीक्षा देणारे साधारण सहा लाखांवर उमेदवार परीक्षा नेमकी कधी होणार? या चिंतेत आहेत.
यासंदर्भात परीक्षा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीईटीचा पेपर फुटल्यानंतर त्याची प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आली. त्यामुळे आता लगेच परीक्षा घेतली, तर जुन्याच पेपरमधील काही प्रश्न नवीन प्रश्नपत्रिकांमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता नव्याने प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागणार आहेत. त्यासाठी साधारण अडीच ते तीन महिने लागू शकतात. त्यामुळेच परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्याशिवाय पर्याय नाही.
तसेच राज्य शासनाने नवीन टीईटी परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला आहे. परंतु रद्द केलेली परीक्षाच ऑनलाईन घेता येईल का? याविषयी शिक्षण आयुक्त तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर परीक्षा परिषदेतील अधिकारी चर्चा करणार आहेत. शक्य झाल्यास रद्द झालेली परीक्षाच ऑनलाईन घेण्यासंदर्भात विचार विनिमय सुरू आहे. अन्यथा रद्द झालेली परीक्षा पारंपरिक ऑफलाईन होईल आणि नवी परीक्षा मात्र ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
‘परीक्षेची तारीख लवकरच कळवू’
शिक्षक पात्रता परीक्षेची अद्ययावत तारीख परीक्षा परिषदेकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. अडीच ते तीन महिन्यांनी परीक्षा होणार आहे. त्यामुळे समाजमाध्यमांतील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या परीक्षेचा दिनांक तसेच परीक्षा नेमकी कशा पद्धतीने घेतली जाणार आहे. यासंदर्भात अधिकृत माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
परीक्षा ऑनलाइनच घेण्याची जय्यत तयारी
यापूर्वीही २०१९च्या ‘टीईटी’मध्ये ७ हजार ८७४ उमेदवारांचा गैरप्रकारात सहभाग होता. २०१८च्या परीक्षेत १ हजार ६६३ उमेदवारांनी गैरप्रकार केले होते. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या टीईटी परीक्षेवेळी मुरगुड येथील पोलिस ठाण्यात गैरप्रकाराबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा पेपर फुटल्यामुळे अधिकारी सैरभैर झाले असून, आता परीक्षा ऑनलाईनच घेता येईल का? यासाठी अधिकारी तयारी करीत असून, तांत्रित अडथळे आले नाहीत तर रद्द झालेली परीक्षाच ऑनलाईन घेण्याची मानसिकता राज्य परीक्षा परिषदेची असल्याचे देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.