Sushma Andhare Pudhari
पुणे

TET MHADA Paper Leak Case: टीईटी-म्हाडा पेपरफुटीवरून राजकीय रणकंदन; सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर पलटवार

‘घोटाळा ठाकरे सरकारच्या काळात नाही, तर पारदर्शक तपासामुळे उघडकीस आला’; भाजप-महायुतीवर गंभीर आरोप

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यातील टीईटी आणि म्हाडा पेपरफुटी घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला. ''ठाकरेंच्या काळात राज्यातील सर्वांत मोठा टीईटी पेपरफुटी घोटाळा झाला, हा दावा वस्तुस्थितीला धरून नाही. हा घोटाळा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात घडला नसून, त्यांच्या पारदर्शक प्रशासनामुळे आणि पोलिसांना दिलेल्या पूर्ण स्वातंत्र्यामुळे उघडकीस आला,'' असा दावा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला. या वेळी त्यांनी भाजप व महायुती सरकारवर गंभीर आरोप करीत पेपरफुटी प्रकरणातील अनेक व्यक्तींची नावे आणि त्यांच्या भूमिकेचाही उल्लेख केला.

अंधारे म्हणाल्या, की टीईटी पेपरफुटी घोटाळ्याची पाळेमुळे २०१६ मध्ये भाजपच्या कार्यकाळात रोवली गेली. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात कर्नाटकमध्ये बंदी घालण्यात आलेल्या 'जीए सॉफ्टवेअर' कंपनीला महाराष्ट्रात परीक्षा प्रक्रियेचे कंत्राट देण्यात आले. या कंपनीचा मालक प्रीतीश देशमुख याला ११ डिसेंबर २०२१ रोजी म्हाडा पेपरफुटी प्रकरणात रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर तपासाची व्याप्ती वाढत गेली आणि संपूर्ण रॅकेट समोर आले, असे त्या म्हणाल्या.

महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणात कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाई केली, असा दावा करत अंधारे म्हणाल्या, की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तपास यंत्रणांना पूर्ण 'फ्री हँड' दिला होता. त्यामुळे शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, उपसंचालक तुकाराम सुपे आणि आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांच्यापर्यंत तपास पोहोचला. या प्रकरणात तुकाराम सुपे यांच्या घरातून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, दागिने, वाहने आणि मुदतठेवी जप्त केल्याचा दावाही त्यांनी केला.

पेपरफुटी घोटाळ्यात सुमारे साडेतीन हजार बोगस उमेदवारांची नावे समोर आली होती. त्यामध्ये तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलीचाही समावेश होता. मात्र, उद्धव ठाकरे सरकारने कोणालाही पाठीशी न घालता सर्व संबंधित उमेदवारांना ब्लॅकलिस्ट करून त्यांची नियुक्ती रद्द केली आणि दिलेले वेतनही वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली, असा दावा अंधारे यांनी केला.

महायुती सरकारवर टीका करताना अंधारे म्हणाल्या, की तुरुंगातून बाहेर आल्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी अभिषेक सावरीकर याला भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर मृदा व जलसंधारण विभागाच्या पेपरफुटी प्रकरणातही त्याचे नाव पुन्हा समोर आले. तसेच, आरोपी आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पुन्हा महत्त्वाच्या पदावर नियुक्ती दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

पेपरफुटीचा पर्दाफाश करणाऱ्या आयपीएस नवटके कोण?

पुण्याच्‍या तत्‍कालीन आर्थिक व गुन्‍हेशाखेच्‍या पोलिस उपायुक्‍त भाग्यश्री नवटके यांनी टीईटी, म्‍हाडा, आरोग्य भरती या परीक्षांच्‍या घोटाळ्यांचा पर्दाफाश केला होता. नवटके यांनी कोणत्‍याही राजकीय हस्‍तक्षेपाला थारा न देता अत्‍यंत निर्भिडपणे या प्रकरणाचा तपास केला. नवटके यांच्याबाबतही अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केले. नवटके यांनी आंतरराज्यीय पेपरफुटी रॅकेट उघडकीस आणले होते. या तपासाची नोंद केंद्र सरकारच्या नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर 'बेस्ट केस स्टडी' म्हणून झाली होती. मात्र, त्यांना गौरविण्याऐवजी चंद्रपूर आणि नंतर गोंदिया येथे बदली करून त्रास देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या बदल्यांमध्ये तत्कालीन पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भूमिकाही संशयास्पद असल्याचे अंधारे यांनी म्हटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT