Pune News: गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारने शेतकरी, महिला, तरुणांना स्वावलंबी केले आहे. विकासाच्या दिशेने वेगाने महाराष्ट्र पुढे जात आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र मीडिया सेंटरमध्ये सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मोहोळ बोलत होते.
या वेळी त्यांनी भाजपच्या पाच वर्षांच्या संकल्पपत्राविषयीची माहिती दिली. ते म्हणाले, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण क्षेत्र, सामाजिक जीवनमान उंचविण्याच्या योजनांचा समावेश आहे. संकल्पपत्र तयार करताना 877 गावांमधून 8 हजार 537 सूचनांचा विचार केलेला आहे.
आम्ही दिलेले वचन पाळतो म्हणून आमचे सरकार पुन्हा आले आहे. लाडकी बहीण योजनेतून वर्षाला 18 हजार, किसान सन्मान योजना 15 हजार वर्षाला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या दहा वर्षांत जाहीरनाम्यातील 370 कलम, तिहेरी तलाक, श्रीराम मंदिर उभारणी या आश्वासनांची पूर्ती केली.
मुंबईत कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग केला आहे. आगामी पाच वर्षांच्या संकल्पपत्रात पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण क्षेत्र, सामाजिक जीवनमान उंचविण्याच्या योजनांचा समावेश आहे. भाजपने 877 गावांमधून 8 हजार 537 सूचनांचा विचार करून संकल्पपत्र तयार केला आहे, असे मोहोळ यांनी नमूद केले.
अडचणीत सापडलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना केंद्र सरकारने एनसीडीसीच्या माध्यमातून साडेसात हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. ही मदत कोणता पक्ष, नेता यांच्याकडे बघून नाही, तर शेतकर्यांकडे बघूनच मदत केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कारखान्यालाही केंद्र सरकारने आर्थिक मदत केली आहे. मी नवीन सहकार मंत्री आहे, हे मान्य आहे. मी शेतकर्याचा मुलगा आहे. त्यामुळे सहकार काय आहे, हे माहिती आहे, असे म्हणत मोहोळ यांनी जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.