सोमेश्वरनगर: अजितदादा पवार यांच्या निधनानंतर प्रथमच होणाऱ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये कोणते पक्ष आणि आघड्या पॅनेल उभे करणार, याची उत्सुकता कारखाना सभासदांमध्ये आहे.
अजितदादा नसल्यामुळे प्रत्येकालाच 'सोमेश्वर'चे मैदान सोपे वाटू लागल्याने अनेक नेतेमंडळी बाह्या सरसावून रिंगणात येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांचे सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत, हासुद्धा दादा नसण्याचा परिणाम आहे. या पक्षाची उमेदवारनिवडीची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. पक्षाकडून विविध गावांमध्ये भेटीगाठी आणि दौरे सुरू करण्यात आले आहेत.
दुसरीकडे, भाजपसह इतर पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यानंतर आता भाजपकडूनही इच्छुकांची चाचपणी सुरू झाली आहे. त्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी (दि. १९) दुपारी चार वाजता निरा येथे आयोजित केल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाकडूनही इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.
शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनीही तयारी केली आहे. पाच पक्षांसह अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. आघाड्या, परस्परपाठिंबा आणि उमेदवारांची अंतिम जुळवाजुळव निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात होईल, असे दिसत आहे. सध्या विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांची निवड, गटबांधणी आणि संभाव्य आघाड्यांबाबत खलबते सुरू आहेत.
भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, ज्येष्ठ नेते चंदरराव तावरे, माजी आमदार अशोक टेकवडे, माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे, भाजप मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय काकडे, मार्केट कमिटीचे माजी सभापती दिलीप खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या मुलाखती होणार आहेत.
चौकाचौकांत उमेदवारीची चर्चा
उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता कोणत्या गटातून कोणाला संधी मिळणार, याबाबत गावोगावी आणि चौकाचौकांत चर्चा रंगू लागल्या आहेत. इच्छुकांकडून मतदारांशी संपर्क, भेटीगाठी आणि राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरपर्यंत सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे.