धनंजय थोरात
वालचंदनगर : इंदापूर तालुक्यात सुरू असलेल्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बंदिस्त गटार (ड्रेनेजलाइन) करण्यात येत आहे. परिणामी, पावसाचे पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद होऊन पावसाळ्यात येथील शेतकर्यांची पिके पाण्याखाली जाण्याचा धोका आहे.
सध्या पालखी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्रीय रस्ते महामार्गाने पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी काढून देण्यासाठी दोन्ही बाजूंनी रस्त्याहून किमान 1 ते 2 फूट उंचीचे बंदिस्त गटार बनविले आहे. या गटार वाहिनीमुळे रस्त्याचे आयुर्मान वाढण्यास नक्कीच मदत होईल; परंतु यात शेतकरी पूर्णपणे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सदर बंदिस्त वाहिनी मूळ जमिनीपासून 4 ते 5 फूट उंच असून, या सिमेंट भिंतींना शेतकर्याच्या बाजूचे पाणी वाहून नेण्यासाठी कोणताही मार्ग ठेवलेला नाही. यामध्ये रस्त्याच्या आतील बाजूचेच पाणी जाण्यासाठी छिद्रे ठेवली आहेत. परिणामी, रस्त्यालगतच्या जमिनींमध्ये पावसाळ्यात पाणी साचणार आहे.
जुन्या रस्त्याच्या बाजूने मोठी चारी होती. त्यामुळे बाजूच्या शेतातील पाणी या चारीतून वाहून जात होते. आता रस्त्याच्या बाजूची चारी संपुष्टात आल्याने पाणी वाहून जाण्यास रस्ताच उरला नाही.
शेतकर्यांपुढे संकट
रस्ते महामार्ग विभागाने शेतकर्यांची संपादित केलेली सर्व जमीन तंतोतंत वापरात आणली आहे. त्यामुळे आता पावसाचे पाणी काढून द्यायचे झाल्यास प्रत्येक शेतकर्याला स्वमालकीच्या उर्वरित जमिनीतून चारी काढून द्यावी लागणार आहे. यासाठी जमीन पडीक ठेवावी लागणार असल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
https://youtu.be/wimwsVNgHnY