पारगाव : पुढारी वृत्तसेवा : खाणाखुणांवरून नावे ओळखण्याची शिवकालीन गोंधळी कला आता लोप पावण्याच्या मार्गावर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील ही प्रभावी ठरलेली गुप्तचर विभागाची कला सादर करून आपली उपजीविका करणार्या गोंधळी कलावंतांकडे शासनानेदेखील दुर्लक्ष केले आहे. पारगाव (ता. आंबेगाव) परिसरात अंबड (जि. जालना) येथील सुखदेव रंगनाथ चव्हाण, अर्जुन बबन शिंदे आणि विकास शिंदे हे गोंधळी कलाकार दाखल झाले आहेत.
विविध गावांमध्ये जाऊन हे कलावंत हातांच्या बोटांच्या साह्याने वेगवेगळ्या खाणाखुणा करून बरोबर नावे ओळखतात. यातून त्यांना रोख बक्षिसे मिळतात. या कलेतूनच ते आपला उदरनिर्वाह करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात हेरगिरी करणारे बहिर्जी नाईक यांना ही कला अवगत होती. त्या कलेच्या जोरावर त्या काळातील गुप्तचर विभागामार्फत अनेक यशस्वी कारवाया केल्याची उदाहरणे इतिहासात आहेत. दरम्यान हे गोंधळी कलावंत खाणाखुणांवरून नावे ओळखतात, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, आई तुळजाभवानी मातेची गीते गाऊन मने जिंकत आहेत.
हेही वाचा :