Candidate Pudhari
पुणे

Shirur Taluka Future MLA: शिरूर तालुक्यात ‘भावी आमदारां’ची चलती; स्थानिक निवडणुकांनंतर नवे राजकीय समीकरण

जिल्हा परिषद निवडणुकांनंतर उदयाला येणारे नवे चेहरे, तीर्थाटन राजकारण आणि कोट्यवधींच्या खर्चाची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

निमोणे: एकदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या, शिरूर तालुक्यातील अनेक नव्या जुन्या चेहऱ्यांना परत संधी मिळाली... मात्र, या निवडणुकीने तालुक्याच्या राजकीय पटावर भावी नेतृत्वाची सुप्त पेरणी केल्याचे आता लपून राहिले नाही..

काही ठिकाणी आरक्षणाच्या राजकारणाने संधी हुकली म्हणा किंवा ‌‘झेडपी‌’त काय राहिले त्यापेक्षा आता लक्ष फक्त विधानसभा हा मानस असणारे पाच-सहा चेहरे या निवडणुकीच्या निमित्ताने पुढे आल्यामुळे आणि त्यांचे समर्थक ‌‘फिक्स‌’ आमदार किंवा भावी आमदार म्हणूनच सोशल मीडियावर पोस्ट फिरवू लागल्याने शिरूर तालुक्याच्या राजकारणात आजी-माजी आमदारापेक्षा भावी आमदारांचा रुतबा वेगळाच असल्याचे आता दिसू लागले आहे.

शिरूर-हवेलीचे विद्यमान आमदार मूळचे हवेली तालुक्यातील, तर माजी आमदार अशोक पवार हे पराभूत असल्याने म्हणा किंवा तुतारी गटात असल्यामुळे त्यांना काही मर्यादा असल्याने तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गटनिहाय बाहुबली नेतृत्व पुढे आले आहे, यातील 90 टक्के जणांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत प्रत्यक्ष उमेदवारी केली नाही. मात्र, त्यांनी ज्यांना बळ दिले त्यांनी गुलाल पाहिल्यामुळे आपोआपच आपला नेता लय पावरफुल तो ज्याला बोट लावतो तो जिंकतो, ही प्रतिमा निर्माण झाली आहे.

शिरूरच्या राजकारणातील भावी नेतृत्व म्हणून उदयाला येऊ पाहणाऱ्या मंडळींना त्यांचे समर्थक, आप्पा, भाऊ, बापू, सभापती, भैय्या, दादा, नाना या आदरयुक्त नावांनी ओळखत असल्यामुळे आणि नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीला जास्तीत जास्त 30-35 कोटी, तर कमीत कमी सात-आठ कोटी खर्च आल्याचे आता काही लपून राहिले नाही. मग आप्पा, भाऊ, दादा कशात कमी आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार माऊली कटके यांनी मतदारसंघातील हजारो नागरिकांना उज्जैन येथील महाकाल दर्शन घडवले, तोच कित्ता बहुतांश जिल्हा परिषद गटातील उमेदवारांनी निवडणूककाळात गिरवला, किती लोक नेल्यानंतर किती खर्च येतो याची आकडेमोड ज्याचा त्याचा समर्थक आता मांडतो आहे.

विधानसभेला चार पावणेचार वर्षे वेळ आहे, महाकाल असो की आयोध्या, अजमेर शरीफ, दीक्षाभूमी या सर्व पवित्र ठिकाणी निवडणूकपूर्व तीन महिने भाविक मतदारांना घेऊन जाण्याची ताकद भावी आमदारांमध्ये असल्याची त्यांच्या समर्थकांना पुरेपूर खात्री आहे. तीर्थाटन झाल्यानंतर निवडणुकीसाठी जे काही गूळ-खोबरं लागतं, त्याची कुणाकडेच कमतरता नाही. शंभर प्लस खर्च करण्याची दानत असणारी माणसं आता मागे हटणार नाहीत, याची त्यांच्या समर्थकांना पुरेपूर खात्री असल्याने ‌‘अभी नही तो कभी नही!‌’ या जोशात त्यांचे समर्थक सोशल मीडियावर पोस्टचा धुमाकूळ घालतात. खासगीमध्ये त्यांचे समर्थक मांडत असलेल्या आकडेमोडीनुसार जर खरोखरच सगळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर शिरूर तालुक्यातील सामान्य माणसाचं दरडोई उत्पन्न वाढण्यास हे उमेदवार नक्की हातभार लावतील, हे मात्र खरे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT