शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील पाबळ-केंदूर परिसरातील बारा गावांसाठी 1100 कोटीच्या सिंचन योजनेला गती मिळाली आहे. याबाबत सिंचन भवन पुणे येथे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची शुक्रवारी (दि. 10) आढावा बैठक पार पडली.
या योजनेसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पलांडे व शेखर पांचुदकर यांनी पाठपुरावा केला. ही बैठक आमदार राहुल कुल यांच्या विशेष प्रयत्नातून आयोजित केली होती. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री विखे पाटील यांनी या भागातील योजना मार्गी लावणार असल्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार या बैठकीत विविध अडचणी दूर करून अधिकाऱ्यांना विविध प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या वेळी या प्रकल्पासाठी 1.14 टीएमसी पाणी उपलब्धतेबाबत प्रस्ताव सादर केला. यास 30 मेपर्यंत मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. या योजनेअंतर्गत एकूण 12 गावे लाभार्थी ठरणार आहेत. सुमारे 1000 मिमी व्यासाची पाइपलाइन उभारण्यात येणार असून, प्रकल्पाचा अंदाजित खर्च 100 कोटी रुपये आहे. बॅरेज डिझाइनचे काम तातडीने सुरू करण्याचे तसेच कन्सल्टंटच्या तातडीने नियुक्तीचे निर्देश दिले.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील पाणीटंचाई कमी होऊन शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. या बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्य अभियंता ए. के. धुमाळ, जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पलांडे, शेखर पाचुंदकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अशोकराव पलांडे, सतीश पाचंगे, समरजित गायकवाड आदी उपस्थित होते.
प्रकल्पाची टाइमलाइन केली स्पष्ट
मेअखेरपर्यंत लिफ्ट इरिगेशन सिस्टिम (एलआयएस) साठी जनरल लेआउट व बॅरेज लेआउट तयार करणे अपेक्षित आहे. प्रकल्पाचे अंदाजपत्रक व 30 जूनपर्यंत प्रशासकीय प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश दिले. 30 मेपर्यंत पाणीपुरवठा डिझाइन पूर्ण करण्याचे आदेश दिले. प्रकल्पामध्ये 100 टक्के सौर ऊर्जेचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. चासकमान कालवा, शिक्रापूर शाखा क्र. 2 येथे मंजूर 15 पदे तातडीने भरवेत तसेच जातेगाव बुद्रुक येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे नादुरुस्त दरवाजे बदलण्याचे निर्देश संबंधित विभागास देण्यात आले.