पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिफेक्ट्रीवर (भोजनालय) अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली होती. त्या रिफेक्ट्रीला पुन्हा चालू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मेस सुरू झाली पाहिजे; परंतु विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणाऱ्या आणि निलंबन झालेल्या चालकालाच अभय कशासाठी? असा संतप्त सवाल विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे.
सध्या राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई करीत आहे. प्रामुख्याने निकृष्ट अन्न आणि अपुऱ्या सेवासुविधा असलेल्या आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे. अशाच प्रकारची कारवाई काही दिवसांपूर्वी विद्यापीठामधील रिफेक्ट्री (भोजनगृहावर) केली होती. यामध्ये विद्यापीठातील संबंधित मेसचालकाचा परवाना निलंबित करण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा मेस चालू करताना नवीन मेसचालकांना संधी देणे अपेक्षित होते.
त्यासाठी नवीन टेंडर प्रक्रिया राबविणे गरजेचे होते. परंतु, निलंबित झालेल्या मेसचालकालाच पुन्हा एकदा परवानगी दिली आहे. तसेच, यासंदर्भात उपाहारगृह व दक्षता नियंत्रण समितीच्या सदस्यांना देखील कल्पना देण्यात आली नाही. त्यामुळे एकूणच ही सर्व प्रक्रिया संशयास्पद असून, नवीन चालकासह आणि रीतसर टेंडर प्रक्रिया पार पाडून मेस सुरू झाली पाहिजे; जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही आणि विद्यार्थ्यांना उत्तम व पौष्टिक अन्न मिळेल, असा पवित्रा विद्यार्थी संघटनांनी घेतला आहे.
काय आढळले होते एफडीएच्या तपासणीत...
अन्नपदार्थ गरम, थंड व गोठवून सुरक्षित तापमानात ठेवण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाही.
अन्न, पॅकेजिंग साहित्य, रसायने आणि इतर वस्तूंच्या सुरक्षित साठवणुकीसाठी पुरेशी व स्वतंत्र साठवणव्यवस्था उपलब्ध नव्हती.
कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना अपुऱ्या होत्या.
अन्न संपर्कात येणारी उपकरणे व भांडी योग्य स्थितीत नसून त्यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण व्यवस्था अपुरी होती.
ज्या मेसचालकांच्या वारंवार तक्रारी विद्यार्थी करतात आणि अन्न व औषध प्रशासन परवाना निलंबित करते. असा मेसचालक पुन्हा चांगले जेवण देईल, याची काही शाश्वती आहे का? त्यामुळे नियमांना डावलून विद्यापीठ प्रशासनाने जो चुकीचा निर्णय घेतला आहे, तो तत्काळ रद्द झाला पाहिजे.डॉ. राहुल ससाणे, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती
जेवणाची गुणवत्ता तपासूनच कुठल्याही मेसचालकास परवानगी द्यावी तसेच यापुढे या मेसमध्ये विद्यार्थ्यांच्या अन्नामध्ये किडे, झुरळ आढळणे असे प्रकार घडल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.निधी नारंग, (महानगर सहमंत्री, अभाविप, पुणे)
विद्यापीठाच्या रिफेक्ट्रीचे काम एका ठेकेदाराला तीन वर्षांसाठी देण्यात आले. स्वच्छतेच्या अनुषंगाने एफडीएने तपासणी करून काही त्रुटी आढळल्याने त्याचा परवाना निलंबित केलेला होता. त्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी रिफेक्ट्रीमध्ये स्वच्छता मानकांच्या अनुषंगाने बरेच फेरबदल विद्यापीठ प्रशासनाने केले व इतर बाबींची पूर्तता संबंधित ठेकेदारांनी केली. त्याची पुनश्च पाहणी करून एफडीएने त्यास परवाना बहाल केला असल्यामुळे संबंधित भोजनगृह सुविधा सुरळीत सुरू होऊन विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे. भविष्यात या अनुषंगाने तक्रारी उद्भवणार नाहीत, या दृष्टीने गुणवत्ता दक्षता समिती कार्यरत राहील व अशा घटनांना गांभीर्याने घेतले जाईल.डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ