Sant Tukaram Maharaj Palkhi Pudhari
पुणे

Sant Tukaram Maharaj Palkhi: वरवंडकरांचा तुकोबारायांच्या पालखीला भावपूर्ण निरोप; दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी बारामतीकडे रवाना

ज्ञानोबा-तुकोबाच्या जयघोषात पालखी प्रस्थान; वारकऱ्यांसाठी सेवा-सुविधांचा आदर्श, ग्रामस्थांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू

पुढारी वृत्तसेवा

रामदास डोंबे

खोर: जगदगुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचा दौंड तालुक्यातील दोन दिवसांचा अविस्मरणीय मुक्काम मंगळवारी (दि. १४) संपन्न झाला. वरवंड येथील दुसरा मुक्काम पूर्ण करून पालखी सोहळा हजारो वारकरी, टाळ-मृदुंगाचा निनाद, "ज्ञानोबा-तुकोबा"च्या अखंड जयघोषात बारामती तालुक्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. यावेळी वरवंड ग्रामस्थांनी अत्यंत भक्तिभाव, श्रद्धा आणि भावनिक वातावरणात पालखी सोहळ्याला निरोप दिला.

पालखी सोहळा दौंड तालुक्यातील पाटस मार्गे रोटी घाट ओलांडून बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथे मुक्कामासाठी रवाना झाला. वारीच्या संपूर्ण प्रवासातील सर्वाधिक अंतर असलेल्या सुमारे ३८ किलोमीटरच्या टप्प्यावर हा मुक्काम असल्याने वारकऱ्यांसाठी हा प्रवास विशेष महत्त्वाचा मानला जातो.

सकाळी सुमारे ६.१५ वाजता पालखी प्रस्थान करताना "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल", "ज्ञानोबा-तुकोबा"च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी ग्रामस्थ, महिला, ज्येष्ठ नागरिक व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करून तसेच विठ्ठल नामाचा गजर करत ग्रामस्थांनी भावपूर्ण निरोप दिला.

यावेळी वरवंड गावचे उपसरपंच बाळासाहेब जगताप, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दशरथ दिवेकर, गावचे मानाचे पाटील रत्नाकर दिवेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर वरवंड ग्रामपंचायतीच्या वतीने तात्काळ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पालखी मुक्कामामुळे निर्माण झालेला कचरा, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून ग्रामपंचायतीने स्वच्छतेचा आदर्श घालून दिला.

दौंड तालुक्यातील भांडगाव, चौफुला आणि वरवंड या ठिकाणी झालेल्या पालखी मुक्कामादरम्यान ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी भोजन, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा, निवास आणि विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. या सेवाभावी कार्यामुळे वारकरी आणि ग्रामस्थ यांच्यातील भक्ती, सेवा आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी रवाना होताच अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. पुढील वर्षी पुन्हा याच उत्साहाने आणि भक्तिभावाने तुकोबारायांचे स्वागत करण्याचा संकल्प व्यक्त करत वरवंडकरांनी पालखीला भावपूर्ण निरोप दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT