Mohan Bhagwat  Pudhari
पुणे

Samarth Bharat Initiative: समाजाकडे विश्वासाने पाहण्याची गरज; समर्थ भारत ही संधी व आव्हान– डॉ. मोहन भागवत

समर्थ भारतच्या अद्ययावत संकेतस्थळाचे उद्घाटन; तंत्रज्ञानाच्या मदतीने सामाजिक कामांना गती देण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: समाज संघाकडे सकारात्मकतेने, विश्वासाने बघतो. ही आपल्यासाठी संधी आणि आव्हान दोन्ही आहे. समर्थ भारतसारखी नियोजनबद्ध कामे पूर्व योजनेने हाती घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

मोतीबाग येथे सरसंघचालकांच्या हस्ते समर्थ भारतच्या अद्ययावत संकेतस्थळाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर या वेळी उपस्थित होते. भागवत पुढे म्हणाले की, संघात काम करताना नागरिकांना सुरक्षितता वाटते असा अनुभव आहे. काळाची शर्यत लक्षात घेता समाजाची कामे गतीने झाली पाहिजेत. त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेत स्थानिक पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी ही वेबसाईट नक्कीच उपयोगी आहे.

समर्थ भारत हा एक सामाजिक उपक्रम असून, सामाजिक कामांमध्ये नागरिकांच्या सक्रिय सहभागातून भारताला सक्षम बनवण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. आरोग्यसेवा, शिक्षण, सक्षमीकरण, शाश्वतता आणि समुदाय विकास अशा विविध सामाजिक उपक्रमांशी सामान्य नागरिक, स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था आणि कॉर्पोरेट्‌‍स यांना जोडणे हे समर्थ भारतचे प्रमुख कार्य आहे.

2017 मध्ये सुरू झालेला समर्थ भारत हा एक मोफत प्लॅटफॉर्म असून, नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि कॉर्पोरेट्‌‍स यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी तयार करण्यात आला आहे. नागरिकांना अर्थपूर्ण सामाजिक उपक्रमांशी जोडून, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवकांचे नेटवर्क आणि सीएसआर साठी कटिबद्ध कंपन्या यांना एकत्र आणण्याचे कार्य समर्थ भारत करते. आजपर्यंत समर्थ भारतने 7 हजार 500 हून अधिक स्वयंसेवकांना विविध स्वयंसेवी संस्थांशी जोडले आहे.

2018 मधील स्वच्छ नदी अभियान, कोविड-19 मदतकार्य, 3 लाखांहून अधिक रक्तपिशव्यांचे संकलन, 51 लाखांपेक्षा जास्त भोजन वितरण आणि एक लाखांहून अधिक वैद्यकीय तपासण्या अशा अनेक प्रभावी सामाजिक उपक्रमांना चालना दिली आहे. सेवा भारती, ग््रााम विकास, पूर्णम इकोव्हिजन, स्वरुपवर्धिनी, जनकल्याण ब्लड सेंटर, सेवा आरोग्य, स्वानंद जनकल्याण, एक क्षण आनंदाचा तसेच इतर अनेक संस्थांना पाठबळ दिले आहे. सहकार्याच्या माध्यमातून समुदायांना सक्षम बनवणे, विविध कॉर्पोरेट्‌‍सना कोणत्याही खर्चाशिवाय स्वयंसेवी संस्थांशी जोडून यामुळे सीएसआर गुंतवणूक थेट समाजाच्या गरजांपर्यंत पोहोचविण्यासाठी समर्थ भारत काम करते. या वेळी समर्थ भारतचे मंगेश घाटपांडे, विनोद खरे, अधिराज गाडगीळ उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT