राजगुरुनगर: आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले असून, गॅस सिलिंडरबरोबरच युरिया खताच्या टंचाईने शेतकरी त्रस्त झाले आहेत. खेड तालुका खरेदी विक्री संघाच्या केंद्रात युरिया खरेदीसाठी शनिवारी (दि २१)शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. गॅस सिलिंडर आणि शेतीसाठी गरजेचे खत मिळवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकरी आणि कामगार वर्ग उन्हात उभे राहून या टंचाईचा सामना करत आहे.
इस्रायल-इराण युद्धामुळे नैसर्गिक वायू (गॅस) पुरवठ्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. भारताच्या युरिया उत्पादनासाठी लागणारा मोठा भाग नैसर्गिक वायूवर अवलंबून आहे. आखातातील देशांकडून (ओमान, कतार, सौदी अरेबिया इ.) युरिया आयात होत असते, ज्यात सुमारे ७५ टक्के वाटा आहे. युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक विस्कळीत झाल्याने गॅस आणि खतांच्या किंमतीत वाढ झाली आहे. केंद्र सरकारने खत कंपन्यांसाठी गॅस कोटा ७० टक्क्यांवर मर्यादित केल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
खेड तालुक्यातील सहकारी खरेदी विक्री संघात शुक्रवारी रात्री उशिरा एक ट्रक (३५ टन) युरिया उपलब्ध झाला. माहिती मिळताच शनिवारी भल्या सकाळी शेतकऱ्यांची गर्दी उसळली. उन्हाच्या तीव्र झळा असतानाही शेतकरी रांगेत उभे राहून तिष्ठत राहिले. मर्यादित आवक आणि भरमसाठ मागणी यामुळे रांगेत उभे राहून देखील अनेक शेतकऱ्यांना संध्याकाळी रिकाम्या हाताने परतावे लागण्याच्या शक्यतेने गर्दी झाली. स्थानिक शेतकऱ्यांच्या मते, उन्हाळी हंगामातील भुईमूग, कांदा, भाजीपाला पिकांसाठी युरिया अत्यावश्यक आहे, पण टंचाईमुळे खत देण्यात अडचणी येत आहेत. काही ठिकाणी (खासगी विक्रेते) काळ्या बाजारात जादा दराने युरिया विक्री होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.
"गॅस टंचाईमुळे सिलिंडर मिळत नाहीत, त्यात युरिया मिळत नाही. घरात आणि शेतात पिकांचं काय होणार?" असा सवाल खेड तालुक्यातील शेतकरी उपस्थित करत आहेत. महागाई आणि टंचाईच्या दुहेरी माराने ग्रामीण भागातील कामगार वर्गही भयभीत झाला आहे. मजुरी कमी होत असताना खर्च वाढल्याने घर चालवणं कठीण झालं आहे. केंद्र आणि राज्य सरकारने खत साठा पुरेसा असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात टंचाई जाणवत आहे. या संकटातून शेतकऱ्यांना लवकर मुक्ती मिळावी आणि पुरवठा साखळी मजबूत व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा, येणाऱ्या हंगामात उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती आहे.
आधार कार्डनुसार एका शेतकरी व्यक्तीला एक युरिया खत ३५० रुपये प्रति गोन (४५किलो) विक्री केली जात आहे. तुटवडा असला तरी कोणतीही भाववाढ आकारली जात नाही. संघाकडे साठा असुन मागणी असल्याने अधिक युरिया उपलब्ध करून दिला जाणार आहे.नरेंद्र थिगळे, अध्यक्ष, खेड तालुका खरेदी विक्री संघ.