खडकवासला: राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर आज शनिवारी (20) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भल्यामोठ्या आग्या मोहोळाच्या मधमाश्यांनी तुफान हल्ला केला. त्यात 35 पर्यटक जखमी झाले. सर्व जण मुंबई, कराड आणि पुण्यातील आहेत.
त्यातील गंभीर जखमींवर वेल्हे बुद्रुक येथील सरकारी ग््राामीण रुग्णालयात तसेच नसरापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजगड किल्ल्याच्या सर्व माची तसेच तटबंदी, बुरुजाच्या कडे-कपाऱ्यात मोठमोठी आग्या मोहोळाच्या माश्यांची शंभराहून पोळे आहेत. अलीकडच्या चार-पाच वर्षांत मधमाश्यांच्या हल्यात मोठ्या संख्येने पर्यटक जखमी झाले आहेत, तर काहींचा मृत्यू झाला आहे. मधमाश्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे मोठ्या दुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे. ही घटना राजगड किल्ल्याच्या अतिदुर्गम सुवेळा माचीवर घडली. माचीवरील कड्या-कपारीत असलेल्या भल्यामोठ्या पोळ्याच्या मधमाश्यांनी पर्यटकांवर अचानक तुफान हल्ला केला त्यामुळे वाट मिळेल तिकडे पर्यटक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत सुटले. ज्येष्ठ पर्यटकांना पळता आले नाही, त्यामुळे त्यांच्या अंगावर मधमाश्या तुटून पडल्या.
पद्मावती माचीकडे येईपर्यंत मधमाश्या पर्यटकांचा चावा घेत होत्या. त्यात मुंबई येथील गंधार मटट्ल, धनंजय खोत, ऋषिकेश जाधव, प्रशांत मरटराज कळसकर आदींसह कराड येथील अविनाश चव्हाण, गणेश चव्हाण, सूरज पाटील तसेच पुण्यातील पर्यटक जखमी झाले. मुंबई येथील काही पर्यटक गुंजवणेमार्गे गडावरून खाली उतरले. त्यांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत पाठविण्यात आले, तर कराड येथील तिघांनाही राजगडचे पहारेकरी बापू साबळे, दादू वेगरे, दीपक पिलावरे, बाबू हिरवे व इतरांनी स्ट्रेचरवरून खाली आणले, नंतर त्यांना शासकीय रुग्णवाहिकेतून वेल्हे बुद्रुक येथील सरकारी ग््राामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वडील-मुलात ताटातूट
मधमाश्यांच्या हल्ल्यात मुंबई येथील ऋषिकेश जाधव ( वय 45) हे जखमी झाले. त्यांचा मुलगाही जखमी झाला. मधमाश्यांच्या तुफान हल्ल्यामुळे मुलाला गुंजवणेमार्गे खाली आणले, तर वडिलांना पाल खुर्द मार्गाने खाली आणले. वडील व मुलाची काही काळ ताटातूट झाली. अचानक कोसळलेल्या संकटामुळे पर्यटक जीव मुठीत धरून खडक, दगड-धोंडे, झाडेझुडपांच्या अतिदुर्गम पाऊलवाटांनी सैरावैरा पळत होते. कोणाला मित्र, कोणाला मुलगा, भाऊ दिसत नव्हता. पहारेकरी, सुरक्षारक्षक, पर्यटकांना धीर देत होते.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत भोईटे म्हणाले, मधमाश्यांनी चावा घेतल्याने दोघांना विषबाधा झाली आहे. त्यामुळे त्यांना जुलाब होत आहेत. त्यांना तातडीने सलाईन सुरू केले आहे. वेळेवर उपचार सुरू झाल्याने आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. राजगड किल्ल्याचे पुरातत्व खात्याचे पहारेकरी बापू साबळे म्हणाले, मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याचे समजताच आम्ही घटनास्थळी धाव घेतली. सुवेळा माचीच्या मार्गावर चोहोबाजूंनी मधमाश्या दिसेल त्या पर्यटकांचा चावा घेत होत्या. डोके, तोंड हातपायांचा चावा घेतलेले पर्यटक आक्रोश करत होते. तरुण पर्यटक वेगाने धावत होते. मात्र, त्यांचे वडील, काही मध्यमवयीन पर्यटकांवर तुफान हल्ला चढवला. त्यामुळे ते ते जखमी झालले पस्तीसहून अधिक जण जखमी झाले. आज सकाळपासूनच राजगड किल्ला पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला होता. जवळपास तीन ते चार हजारांवर पर्यटक होते.
मधमाश्यांच्या पोळ्यांपासून सुरक्षेचे आव्हान
अनेक वर्षांपासून राजगडावर मोठ्या प्रमाणात आग्या मोहोळाच्या माश्यांची मोठमोठी पोळे आहेत. दुर्गमकडे कपाऱ्यात पोळे असल्याने त्यांना काढणे कठीण आहे. त्यामुळे मधमाश्यांपासून पर्यटकांची सुरक्षा करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे. असे असले तरी जागतिक वारसास्थळ म्हणून राजगडाचा समावेश झाल्यापासून देशी-विदेशी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.