राहू: राहू (ता. दौंड) येथील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य चौकात मंगळवारी (दि. 12) रात्री 9.30 वाजेच्या दरम्यान नवरदेवाच्या पाया पडणी समारंभावेळी दोन डीजेमालकांमध्ये आवाजाच्या स्पर्धेवरून जोरदार राडा झाला.
एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात समर्थकांना बोलावून घेण्यात आल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. अखेर उपस्थित महिलांनी धाडस दाखवत मध्यस्थी केल्याने हा वाद निवळला; मात्र, पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे स्थानिक ग््राामस्थांनी तीव नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, राहू गावातील दोन वेगवेगळ्या दिशेचे नवरदेव आपल्या समर्थक आणि नातेवाइकांसह मुख्य चौकात पाया पडण्यासाठी आले होते. या मिरवणुकीसाठी हंडाळवाडी आणि यवत येथील दोन नामांकित डीजे पाचारण करण्यात आले होते. ‘कोणाचा आवाज जास्त’ यावरून दोन्ही डीजेमालकांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे रूपांतर लवकरच शिवीगाळ आणि हाणामारीत झाले.
वाद विकोपाला गेल्यावर दोन्ही बाजूंच्या डीजेमालकांनी आपापल्या समर्थकांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. काही वेळातच दोन्ही बाजूंनी जमाव जमल्याने चौकात रणकंदन माजले. भरचौकात झालेल्या या राड्यामुळे मिरवणुकीत आलेल्या महिला आणि मुलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मिरवणुकीतील काही महिलांनी पुढाकार घेतला. या महिलांनी आक्रमक पवित्रा घेत दोन्ही डीजे तातडीने बंद पाडले आणि भांडण करणाऱ्यांना पांगविले. महिलांच्या या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि वादावर तात्पुरता पडदा पडला.
सध्या हा वाद मिटला असला तरी, डीजेमालकांमधील खुन्नस अद्याप कायम आहे. पुन्हा मिरवणुका निघाल्यास मोठ्या संघर्षाची शक्यता नाकारता येत नाही. यवत पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर कडक कारवाई करीत गुन्हे दाखल करावेत, अशी चर्चा राहूतील नागरिक दबक्या आवाजात करीत आहेत.
यवत पोलिसांना आव्हान
एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनिप्रदूषणाबाबत कडक नियम असताना आणि दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी शांतता राखण्याचे आवाहन केले जात असताना यवत पोलिसांच्या नाकाखाली टिच्चून हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.