वाल्हे: पुरंदर तालुक्यातील वाल्हे परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली असून, काढणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर नैराश्याची वेळ आली आहे.
गतवर्षी समाधानकारक पावसामुळे पाण्याची उपलब्धता चांगली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली होती. यंदा चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र, प्रत्यक्षात दर घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नुकसान होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
सध्या कांद्याला 4 ते 12 रुपये प्रतिकिलो दर मिळत असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी ऊन व पावसापासून संरक्षणासाठी कांद्याची साठवण करण्याकडे वळले आहेत. यासाठी दगडी, लाकडी व लोखंडी कांदाचाळ उभारण्याचे पर्याय वापरले जात आहेत. मात्र, वाढलेली मजुरी, खते, डिझेल आणि लोखंडाच्या किमतीमुळे साठवणूक करणेही खर्चिक ठरत आहे.
दरम्यान, जागतिक परिस्थितीचाही बाजारावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तातडीने दरात सुधारणा होण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत.
खते, औषधे, मशागत, मजुरी यांसारख्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. वातावरणातील बदल, रोगराई आणि फवारणीचा खर्च यावर मात करत 4 महिने जिवापाड पीक जपले; मात्र, सध्याच्या दरात खर्चही निघत नाही. साठवलेल्या कांद्याचे करायचे काय, हा प्रश्न आमच्यासमोर आहे, असे शेतकरी कैलास भुजबळ यांनी सांगितले.