वाल्हे: केवळ अंत्यविधीचे ठिकाण, अशी ओळख असलेली स्मशानभूमी आडाचीवाडी (ता. पुरंदर) येथे गावकऱ्यांसाठी भेटीगाठीचे, तर लहान मुलांसाठी अभ्यासाचे केंद्र ठरत आहे. येथील स्मशानभूमी इतकी स्वच्छ, सुंदर व शांत आहे की स्मशानभूमीबाबत वाटणारी भीती दूर करण्यासाठी येथे रात्रीची ‘शाळा’च भरवली जात आहे. विशेष म्हणजे, मुलेही आनंदाने या उपक्रमात सहभागी होत आहेत. त्यामुळे ही स्मशानभूमी आडाचीवाडीची वेगळीच ओळख बनली आहे.
स्मशानभूमीत जाणे म्हणजे भीती नव्हे, तर शांतता अनुभवणे, असे अनेक ग््राामस्थ सांगतात. गेल्या काही दिवसांपासून गावातील मुले-मुली दररोज संध्याकाळी स्मशानभूमीत दोन तास अभ्यासासाठी एकत्र जमत आहेत. सामान्यतः भीती, ओसाडपणा व शांततेशी जोडली जाणारी स्मशानभूमी आडाचीवाडी मात्र पूर्णपणे वेगळ्या स्वरूपात दिसते. स्वच्छ परिसर, आकर्षक फुलझाडे, बैठकव्यवस्था, पुरेशी प्रकाशयोजना व पाण्याची सोय, यामुळे येथे सातत्याने ग््राामस्थांची वर्दळ असते. दुपारचे जेवण झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक येथे फेरफटका मारण्यासाठी व गप्पांसाठी येतात. काही जण सावलीत विसावा घेऊन मग घरी परततात.
आडाचीवाडीतील हा उपक्रम केवळ सौंदर्यीकरणापुरता मर्यादित नसून ग््राामभावना मजबूत करणारा आहे. स्मशानभूमीचा असा सकारात्मक वापर ही ग््राामविकासाकडे पाहण्याची नवी दृष्टी आहे. मृतसंस्कारांच्या ठिकाणालाच सुरक्षित, शांत व लोकाभिमुख जागेत रूपांतरित करणे, ही अत्यंत अभिनव व कौतुकास्पद बाब आहे. मुलांचे येथे अभ्यासासाठी येणे म्हणजे गावात निर्माण झालेल्या सुरक्षित व निरोगी वातावरणाची साक्ष आहे.संदेश शिर्के, निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड
अवघ्या काही महिन्यांत विकासाची मोठी झेप घेत आडाचीवाडीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. गावकऱ्यांची एकजूट, कामाची कार्यपद्धती आणि नियोजनबद्ध विकास, यामुळे हे गाव इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पायाभूत सुविधा, स्वच्छता व सामुदायिक उपक्रमांसोबतच गावची स्मशानभूमी ही आधुनिक व सुसज्ज पद्धतीने विकसित करण्यात आली आहे.
शाळेतून आल्यावर थकवा असतो, पण संध्याकाळी सगळ्या मित्र-मैत्रिणींसोबत इथे बसून अभ्यास केला की तयारी छान होते. प्रकाशव्यवस्था आणि बसण्याची सोय चांगली आहे. आम्ही आता रोज संध्याकाळी 2 तास इथेच अभ्यास करण्याचा नियम केला आहे.स्वरा पवार, विद्यार्थिनी
स्मशानभूमी ही गावची ओळख नसते; मात्र ती स्वच्छ व सुसज्ज असेल, तर गावचा आदर वाढतो. वयस्कर ग््राामस्थ येथे विरंगुळा करतात, तर मुले अभ्यासासाठी येतात, हे पाहून समाधान वाटते.सुवर्णा बजरंग पवार, सरपंच
शासकीय निधीचा केवळ खर्च न करता गावच्या दीर्घकालीन गरजांना प्राधान्य दिल्यास समृद्ध पंचायत उभी राहू शकते, हे आडाचीवाडीने दाखवून दिले आहे.मोहन पवार, उपसरपंच