पुणे: पाण्याच्या योग्य वापर व्हावा व गळती थांबावी तसेच शहरात सर्वांना समान पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा विभागामार्फत एएमआर मीटर बसण्याचे काम सुरु आहे. मात्र हे मीटर बसविण्यास काही नागरिक व सोसायट्या विरोध करत असल्याचं समोर आलं आहे.
हे मीटर बसवण्यात न आल्याने अधिकऱ्यांना पाणी गळती शोधण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे विरोध करणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार असून थेट नळजोड बंद करण्याचा इशारा पाणीपुरवठा विभागाने दिला आहे. या बाबतचे पत्र विरोध करणाऱ्यांना देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. (Latest Pune News)
पुणेकरांना पाणी पुरवण्यासाठी शहरात जलवाहिन्यांचे जाळे तयार केले जात आहे. धरणांमद्धे मुबलक प्रमाणात पाणीसाठा असतांना देखील पुणेकरांना पाणी पुरवण्यास पाणी पुरवठा विभागाला अडचणी येत आहेत. मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती कायम आहे. अनेक जण मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी वापरत असल्याचं देखील समोर आलं आहे.
अशांवर जलसंपदा विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पालिकेने विविध सोसायत्या आणि आस्थापणांना पाणी जपून वापरण्याचा इशारा दिला आहे. पाण्याची बचत करण्यासाठी पाणी गळती शोधण्याचे उद्दिष्ट देखील पालिकेने ठेवले आहे.
याचाच एक भाग म्हणजे समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नळांना एएमआर मीटर बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत १ लाख ८० हजार मीटर बसलविण्यात आले आहेत. जेथे मीटर बसविण्यात आले आहेत, त्या भागातील पाणी गळती शोधण्यास व पाण्याचा जास्त वापर झाल्यास याची माहिती पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळते.
यामुळे पाणी वापरावर व गळतीवर देखील नियंत्रण ठेवणे शक्य होत आहे. मात्र, शहरातील काही भागात काही सोसायट्या व नागरिक हे मीटर बसवण्यास विरोध करत आहे. यामुळे पालिकेच्या कामात व्यत्यय येत आहे. त्यामुळे आता पालिकेने कठोर भूमिका घेत मीटर बसविण्यास विरोध करणाऱ्यांचे नळजोड बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
मीटर ची जबाबदारी संबंधित ग्राहकांवर
पालिका हद्दीतील सर्व ग्राहकांना मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्यास्तव प्रथम वेळी बसविण्यात येणाऱ्या मीटरचा खर्चपालिकेमार्फत करण्यास पालिकेच्या मुख्य सभेने मान्यता देण्यात आली आहे. पालिकेमार्फत नवीन एएमआर पद्धतीचे स्मार्ट पाण्याचे मीटर्स बसवण्यात येत आहेत. या मीटरचा खर्च महापालिकेमार्फत केला जाणार आहे.
हे मीटर नागरिकांच्या सुचनेनुसार त्यांच्या मालकीच्या जागेत योग्य ठिकाणी बसविण्यात येणार आहे. हे मीटर सुस्थितीमध्ये व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची असून हे मीटर तुटल्यास, नादुरुस्त झाल्यास किंवा चोरीला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ग्राहकावर राहणार आहे.
समान पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत प्राधान्याने नळजोडास एएमआर मीटर बसविण्यासाठी नागरिकांकडून विरोध केला जात आहे. अनेकांनी मीटर बसवले नसल्यामुळे साठवण टाकीवरून पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचे मोजमाप करणे व गळती शोधण्यास अडचणी येत आहेत. पाण्याची गळती कमी करून नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचे मोजमाप करणे आवश्यक असून त्यासाठी नळजोडास तातडीने एएमआर मीटर बसविणे गरजेचे आहे. त्यामुळे एएमआर मीटर बसविण्यासाठी सहकार्य करण्यात यावे अन्यथा यानंतर कोणतीही पूर्व सूचना न देता नाईलाजास्तव आपला नळजोड बंद करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल व त्याबाबत सर्वस्वी जबाबदारी आपली राहील.- नंदकिशोर जगताप, उपायुक्त, पाणी पुरवठा विभाग महापालिका