पुणे: शहरातील अनेक भागांमध्ये कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, नळातून येणारे दूषित पाणी आणि कालबाह्य झालेल्या पाणीपुरवठा यंत्रणेमुळे नागरिकांच्या तक्रारी पुन्हा वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा व्यवस्थेच्या सुधारणेसाठी पुन्हा 'मिशन मोड'मध्ये काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी गुरुवारी दत्तवाडी, राजेंद्रनगर कॉलनी आणि परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
दत्तवाडी आणि राजेंद्रनगर भागांत अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, काही ठिकाणी नळातून घाण पाणी येत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. हीच समस्या कोंढवा, हडपसर आणि कात्रज परिसरातही समोर आल्याने या भागांतही तातडीने तांत्रिक उपाययोजना राबविण्याचे आदेश देण्यात आलेत. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अपूर्ण राहिलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळत असल्याच्या तक्रारीनंतर महापालिकेने शहरात विशेष सर्वेक्षण केले होते. मध्य प्रदेशातील इंदोर आणि गुजरातमधील काही शहरांमध्ये दूषित पाण्यामुळे घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवली होती. या सर्वेक्षणात कोंढवा, शिवनेरीनगर, भाग्योदय नगर, हडपसर, संतोषनगर, अंजनीनगर आणि कात्रज परिसरातील काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याचे आढळून आले.
तपासणीत जुन्या वस्त्यांमधील पाणीपुरवठा आणि ड्रेनेज यंत्रणा जीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन्स आणि ड्रेनेज लाइन्स एकाच पातळीवर किंवा अगदी जवळ टाकण्यात आल्याने गळती झाल्यास सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याचे निदर्शनास आले.
या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा यंत्रणेच्या दुरुस्ती आणि सुधारणा कामांसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. काही भागांमध्ये अद्यापही तक्रारी कायम असल्याने उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्याचे जगताप यांनी सांगितले.
कोणत्या भागांत तक्रारी कायम?
दत्तवाडी, राजेंद्रनगर कॉलनी, कोंढवा, हडपसर, कात्रज, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, संतोषनगर, अंजनीनगर.
समस्येमागील प्रमुख कारणे
जीर्ण झालेल्या पाणीपुरवठा पाइपलाइन्स, ड्रेनेज लाइन्समधील गळती, पाणी व ड्रेनेज पाइप एकाच पातळीवर, अरुंद रस्ते आणि अनियोजित विकास, कमी दाबामुळे दूषित पाणी शिरण्याचा धोका.