पुणे: शहरातील रस्त्यांलगतची झाडे नागरिकांच्या जीवितासाठी धोकादायक ठरत असतानाही झाडे किंवा फांद्या पडून होणाऱ्या दुर्घटनांची संपूर्ण माहितीच महापालिकेकडे उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांत झाडे-फांद्या पडण्याच्या ५ हजार ३६३ घटना घडल्यात.
म्हणजेच, वर्षाला सरासरी १ हजार ७३ आणि दररोज जवळपास तीन घटना घडत आहेत. मात्र, या दुर्घटनांमध्ये किती जण जखमी झाले, किती नागरिकांचा मृत्यू झाला, याची एकत्रित आकडेवारीच प्रशासनाकडे नसल्याने वृक्षसुरक्षेचा महापालिकेचा कारभार 'अंदाजावर'च सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगरसेविका पल्लवी जावळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला महापालिकेने दिलेल्या लेखी उत्तरातून वृक्षसुरक्षेतील ही गंभीर बाब समोर आली आहे. १८ ऑगस्टच्या मुख्य सभेसाठी सादर केलेल्या उत्तरानुसार, २०२४ अखेरच्या वृक्षगणनेत शहरातील रस्त्यांलगत १ लाख २६६५९ झाडांची नोंद आहे.
धोकादायक झाडांची पाहणी करण्याची जबाबदारी वृक्ष अधिकाऱ्यांवर आहे. झाडासंदर्भात अत्यावश्यक तक्रारींवर २४ तासांत, तर अन्य तक्रारींवर तीन ते सात दिवसांत पाहणी केली जाते. मात्र, पाच वर्षांत पाच हजारांहून अधिक घटना घडूनही धोकादायक झाडांसाठी एसओपी नसल्याचे प्रशासनाच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे.
पाच वर्षांतील धक्कादायक आकडे
झाडे किंवा फांद्या पडण्याच्या घटना : ५,३६३
वार्षिक सरासरी : १,०७३
दररोजची सरासरी : जवळपास ३ घटना
रस्त्यांलगतची झाडे : १,२६,६५९
अत्यावश्यक तक्रारींची पाहणी : २४ तासांत
अन्य तक्रारींची पाहणी : ३ ते ७ दिवसांत
माहितीचे तुकडे; जबाबदारी कोणाची?
झाडे पडण्याच्या घटनांची नोंद अग्निशमन विभागाकडे आहे. दुर्घटनांतील जीवितहानीची माहिती मात्र वृक्ष विभाग, अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे स्वतंत्रपणे उपलब्ध आहे. ही माहिती एकत्रित करून त्याचे विश्लेषण करण्याची व्यवस्था नसणे, हीच महापालिकेच्या वृक्षसुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनातील मोठी त्रुटी ठरत आहे.